Monday 9 July 2018

सुटका..

सुटका... 

हिरव्यागार डोंगराच्या कुशीत लपलेल्या त्या छोट्याश्या गावात जन्मं आणि मरण याशिवाय फार दखल घेण्याजोगी गोष्टं फार कधी घडायचीच नाही. गावात माणसं रहात नव्हती असं नाही पण सगळी पोटासाठी पहाटे घराबाहेर पडायची ती संध्याकाळ झाल्याशिवाय घरी यायची नाहीत. खंडाळा सोडला की दोन चार बोगदे गेल्यावर गाडी शब्दशः क्षणभराकरता एके ठिकाणी थांबायची. माणसं उतरायची तिथे. रेल्वेलाईनच्याकडेने एक पायवाट फुटायची ती काही अंतर समांतर जाऊन डोंगराला वळसा घालून सरळ दरीत उतरल्यासारखी दिसायची. उतरलेली माणसं त्या पायवाटेवरून गावात जायची. वरून वस्ती दिसायची नाही. लपून बसल्यासारखी सगळी घरं डोंगराच्या मागे होती. प्रत्येकाची शेती होती पण उत्पन्न फार नव्हतं, पोटापुरतं धान्यं निघायचं. मग रानमेवा द्रोणात भरून विकायचं काम बायका, मुली करायच्या. बरीचशी माणसं रेल्वेत बिगारी होती. सगळी कष्टाची काम तीच माणसं करायची, मग ते रूळ चेक करणं असो, गुड्सच्या गाड्यांवर माल भरणे असो ही सगळी कामं करायला बाप्ये जायचे वाडीतले. त्यांना ड्युटीवर जाण्यासाठी आणि परत आणल्यावर उतरण्यासाठी गाडी तिथे थांबत असे. पावसाळ्याचे चार महिने मात्रं जिकीरीचे असायचे. एकतर संततधार, निसरड्या वाटा, शेतीची कामं वगैरे प्रकारात पार घाम निघायचा त्यांचा. 

अर्थात ती सगळी माणसं काटक होती. सततच्या कष्टामुळे पोट सुटलेला माणूस दिसणं अवघड, सगळे कसे खराट्याच्या काडीसारखे बारीक आणि ताठ. तिथे म्हातारी माणसं मरायला टेकली की मगच घरकोंबडी व्हायची. नाहीतर रुळाच्या कडेला बसून घरच्या माणसांची वाट बघत विड्या पीत, तंबाखू मळत, वाढलेल्या दाढ्या खाजवत बसायची आणि मग आलेल्या माणसाच्या सोबतीने घराकडे जायची. सडा टाकल्यावर जसे पाण्याचे थेंब अंगणात पडतात आणि काही दूरवर पण कुठेही पडतात तशी त्या इवल्याश्या गावातल्या वस्ती विखुरलेली होती. अमाप जागेचा त्यांना काहीही उपयोग नव्हता. कुणी अतिक्रमण करत नव्हतं, भांडण करत नव्हतं, दावे लावत नव्हतं. सगळ्यांचीच परिस्थिती एकसारखीच होती. अंधार पडल्यावर त्या पायवाटेवर स्वतःहून कुणी चालत येईल अशी अजिबात शक्यता नव्हती. आलाच तरी घाबरून तो माणूस दरीत गेला असता पाय घसरून. त्यामुळे तसं गाव सुखी होतं. एरवी दिवसभर घरात लहान रांगती मुलं, कमरेत वाकलेल्या म्हाता-या, बाळंतीण बायका किंवा आजाराने अंथरूण धरलेलं कुणीतरी असंच असायचं. बाकी सगळी गडबड रात्रं होत आली की चालू व्हायची आणि लगेच संपायचीही. लाईट नव्हतेच, सकाळी जायचं असायचं. त्यामुळे जेवलं की बिड्या ओढणे, तंबाखू खाणे आणि बायकांना मिसरी लावणे एवढेच उद्योग असायचे, या किरकोळ व्यसनांनंतर त्यांची चैन संपायची आणि गाव कुणीतरी दम दिल्यासारखं शांत झोपून जायचं. 

शनिवारी रात्री कर्जत किंवा लोणावळ्याहून येताना बरेचजण गुत्त्यावर जाऊन पैसे असतील तेवढी पिऊनच घरी यायचे. पावसाळयात मग पडझड व्हायचीच, कुणी न कुणी नशेत घसरून पडायचं. मग गावात गावठी उपचार केले जायचे आणि माणूस बरा व्हायचा, अगदीच हाड मोडलं तर लोणावळा, मग घरातल्या बाईच्या अंगावरचा एखादा दागिना मोडला जायचा. कमीत कमी गरजा असणारी माणसं सगळी खरंतर पण शहरात गेले की ती कफल्लक व्हायची. त्यामुळे ब-याच वेळा माणसं दुखणी अंगावरच काढायची. रम्या सुर्वे तर पार मेटाकुटीला आला होता खर्च करून. सहा महिन्यामागे त्याचा बाप पाय घसरून रुळावर पडला आणि घोट्याजवळ हाड मोडलं होतं. अज्ञानात सुख असतं, इतकी वर्ष माहित नव्हतं तोवर व्यवस्थित चालू होतं. तपासण्या झाल्यावर त्याला शुगर निघाली. त्यामुळे जखम काही लवकर बरी होईना. एकतर क्षणभर थांबणा-या गाडीत चढायचं त्यात परत लोणावळ्याला उतरून बाहेर यायला जीव जायचा, तिथून दवाखान्यात रिक्षा आणि परत येताना हाच सगळा व्याप. पण नाईलाज होता. म्हातारा तसाही पार ऐंशीला टेकला होता पण टेकीला आला तरी टिकून होता. तसा तो ही रेल्वेतून रिटायर्ड होऊन पेन्शन खात होता इतकी वर्ष. पण गेल्या सहा महिन्यात साठवलेली सगळी पेन्शन संपली होती. 

आज मात्रं दोघे हतबल झाले होते. हाड जुळत आलं होतं पण दुस-या पायाला झालेली जखम दिवसेंदिवस चिघळतच चालली होती. पाण्याने गच्च भरलेल्या पॉलीथीन पिशवीसारखा पाय बदबदला होता नुसता. गँगरीन झालं होतं, पाय कापावा लागणार होता घोट्यापासून. दोन दिवसांनी येतो म्हणून दोघं निघाले. म्हाता-याची अवस्था रम्याला बघवेना. दोघेही स्टेशनवर येईपर्यंत शांत होते. एक्स्प्रेसचा ड्रायव्हर ओळखीचा होता त्यामुळे दोघे इंजिनातच बसले. विचारपूस झाली पण शेवटी ज्याचं त्यालाच. मिनिटभर गाडी त्याने जास्ती थांबवली. बाहेर पाऊस तुफान होता. अंगावर फाटके रेनकोट घालून दोघंही चालू लागले. आता पाय अजूनच रग लागल्यासारखा झाला होता. पायवाटेच्या पहिल्याच वळणाला म्हातारा झाडाच्या आडोशाला थांबला. थोड्या अंतरावर रेल्वेची एक पडीक भंगार लोखंडी केबिन होती. तिथे गेलो तर भिजणार नाही म्हणून रम्याने त्याला कसंबसं तिथे आणलं. पाच मिनिटांच्या अंतराला पंधरा मिनिटं लागली. रम्या अजूनच काळजीत पडला. म्हातारा तापाने फणफणला होता तेवढ्यात. घरी न्यायचं कसं आणि परत आणायचं कसं दोन दिवसांनी हा यक्ष प्रश्नं होता त्याच्यापुढे. वाहन नाही एकतर त्यात पाऊस. रम्याने हात कोरडे करत दोन बिड्या पेटवल्या, एक म्हाता-याला दिली, एक आपण ओढायला सुरवात केली. 

'टैम काय झाला रे?' 
'सात वाजलेत. दम धर. पाऊस थांबल, तोवर सांजच्या गाडीला कुणी ना कुणी येईलच, तुला उचलून न्यायाला हवं, इथे हाय बघ एक खुर्ची, त्यात बसवून नेतो'. 
'ते डागदर काय का म्हणना, म्यां काय यायचो नाय परत तिकडे. घरीच मरतो. किती जगू अजून आणि पैश्ये कुटून आणशील'. 
'ते बघतो मी. ते पाय कापावा लागलंच नायतर अख्खा पाय सडल म्हन्लाय त्यो. घोटाभर गेला तर काठी घेऊन चालशीला तरी, गुडघ्यात कापला तर काय करशील? परवाच्याला पहाटच निघू म्हंजी निवांत आलो तरी एक्स्प्रेस घावतीये बघ. आजचा शिंदे ड्रायव्हर आहे परवा सकाळी. थांबवितोय म्हन्लाय जास्ती वेळ'. 
'तू काय बी म्हन, म्यां काय यायचा नाय. थोट्या पायाने घरात पडून -हावू का? आणि करनार कोन माझं. आपल्या दोगांना बी बायकू नाही, दोगी गेल्या मागच. तू कामावर जाशील का माझं करशील? तुला प्वार असतं तर काय तरी झालं असतं. त्ये जाव दे, घरीच मरन मी त्यापेक्षा, चल जावू हळूहळू. पाऊस काय थांबनारा नाय ह्यो. 

रम्याला काय सुचेना. दोघंही शांत बसून राहिले. अंधार आणि पाऊस, दोन्ही वाढतच राहिले. अंधारात माणसं जात होती गावाकडे पण केबिनला कुणी बघितलं नाही, तशीही ती थोडीशी आतल्या अंगाला होती. घड्याळात नऊ बघून रम्याचे धाबे दणाणले. आपल्याला झोप लागली हे त्याला मान्यं होईना. म्हातारा  पार भट्टीसारखा गरम झाला होता. आता कुणी येईल याची खात्री नव्हती. काय करावं त्याला काही सुचेना. म्हातारा झोपेत बरळत होता. रात्रं तिथे काढण्याशिवाय गत्यंतर नव्हतं आता. बिडी बंडल पण सादळलं होतं. तिथेच पडलेली जुनी ताडपत्री त्याने म्हाता-याचा अंगावर घातली. बिड्या ओढत रम्या अंधारात बघत बसला. तो ही आता पंचावन्नच्या आसपास असेल. सगळा गतकाळ डोळ्यापुढून झरझर जात राहिला. त्याची आई आणि बायको सहा महिन्यांच्या अंतराने गेल्या त्यालाही आता चार वर्ष होऊन गेली होती. त्याला पोरंबाळं काहीच नव्हती. कधी एकदा सकाळ होतीये असं त्याला झालं होतं.सकाळ झाल्यावर प्रॉब्लेम्स सुटणार नव्हते पण उजेड पडणार होता, माणसं दिसणार होती. त्याच्यासाठी ते ही खूप आशादायक होतं. तो ही रेल्वेत होता. रिटायर व्हावं आणि बापाची सेवा करावी जमेल तेवढी हे त्याने डॉक्टरकडे असतानाच मनाशी ठरवलं होतं. त्याला परत झोप लागली. सहाच्या सुमारास पावलं वाजली आणि तो खडबडून जागा झाला. केबिनच्या बाहेर येत त्याने चाहूल घेतली, सगळी ओळखीचीच होती. बाप्ये माणसं पटापट धावली आतमधे. 

म्हातारा रात्रीच कधीतरी थंड पडला होता. मग एकंच हल्लकल्लोळ झाला. जो तो जमेल तेवढं रडू लागला आणि हळूहळू शांत झाला. मग आजारपण, अडचणी यांचा पाढा वाचला गेला. शेवटी त्याला गावात न्यायचं ठरलं, नशिबाने पाऊस थांबला होता. ताडपत्रीत गुंडाळून त्याला न्यायचं ठरलं. लोक आळीपाळीने ओझं उचलत होते आणि रम्या मागे मागे चालत राहिला. गावात परत एकदा सगळा सोपस्कार झाला रडण्याचा आणि विचारपूस करण्याचा. संध्याकाळपर्यंत सगळं पार पडलं. परत येताना खरंतर रम्याला हायसं वाटत होतं. पाय कापायला बाप आला नसता हे ठाम माहित होतं त्याला. तो सुटला याचं खरंतर त्याला खूप समाधान वाटलं होतं पण तसं बोलणं जनरीतीला धरून नव्हतं. घरी आल्यावर तो मग पहाट होईस्तोवर एकटाच हमसाहमशी रडत बसला आणि ग्लानी आल्यासारखा झोपी गेला. जग आल्यावर त्याने बाहेर डोकावलं तर अगदी सोनसळी प्रकाश पडला होता, पाऊस थांबला होता. त्याला खूप प्रसन्नं वाटलं खरंतर आणि लगेच तो ओशाळलाही पण खरंच होतं ते. कितीही माया असली तरी पैसे, ने आण त्याला शक्यं नव्हतं अर्थात त्याने ते पार पाडलं असतंच उरापोटावरून पण काहीवेळा देव करतो ते ब-यासाठी असं म्हणायचं. झेपेल एवढं दुःखं देतो, झेपेनासं झालं, त्याला दया आली की सुटका करतो. 

सुटका, गेलेल्या माणसाची तर होतेच पण पाठीमागे राहिलेल्या माणसाची पण होते, हेच खरं. 

जयंत विद्वांस

Wednesday 4 July 2018

''चारित्र्य ड्रायक्लिनर्स फिल्म्स लि.'


''चारित्र्य ड्रायक्लिनर्स फिल्म्स लि.''...   


'राज्या, लेका बोर्ड तर मस्तं जमलाय. खरंतर पांढ-या बोर्डवर काळ्या अक्षरात लिहावं असं माझं मत होतं पण तुझं नेहमीच जगावेगळं. काळ्या बोर्डवर पांढ-या अक्षरात लिहिण्यात काय लॉजिक आहे तुझं?'
'विनू, कसं आहे माहितीये का तुला, एवढ्या सगळ्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर पांढरा रंग कसा झळकतोय बघ. आपण नाहीतरी तेच केलंय ना. सगळा काळा रंग ती माणसं घेऊन येणार मग आपलं काँट्रीब्युशन काय सांग त्यात. आपण काय करायचं, पॅलेट घ्यायचं, त्यात आपल्याला हवा तेवढाच काळा रंग किंवा डाग घ्यायचा. विनोदाचा साबण, सहानुभूतीची जेल, कौटुंबिक केमिकल टाकून तो धुवायचा. कपडयावर डाग होता हे आपण दाखवलंच त्यामुळे खोटेपणाचा आरोप नाही. वरतून डाग कसा नाईलाजाने पडला हे ठसवलं की झालं'. 
'आयला, राज्या, तू लेका चेह-याने गरीब आहे फक्तं. पटकथा घट्ट लिहितोस त्यामुळे जमतं तुला सगळं नीट'. 
'अरे, तसाही निखळ विनोद लोकांना आवडतो कारण तो दुर्मिळ आहे. कितीही वाईट विचार असेल, दुर्गुण असेल त्याला विनोदाचं अस्तर लावायचं म्हणजे पब्लिक हसत राहतं, दुर्गुण कोण बघतंय आता. तू थेटरात जाऊन पाहिलास का? तीनशे प्लस म्हटल्यावर लोक काय मनापासून हसलेत. असूया रे, लोक सिनेमा का बघतात सांग? जे आपल्याला करता येणं अशक्यं आहे, अर्धवट स्वप्नं आहेत ती कुणीतरी पडद्यावर पूर्ण करतंय ते बघायला पैसे मोजतात. प्रत्येकाला वाटतं चिकणी पोरगी पटवावी, गुंडाना दे घपाघप धुवावं, विनाकष्ट भरपूर पैसे मिळवावेत पण हे सगळं करण्यासाठी लागणारं धैर्य नसतं आणि त्याकरता आऊट ऑफ द वे गेलो तर परिणामांची जाणीव पण असते, त्यापेक्षा बघायला पैसे मोजलेले परवडतं'. 
'तू एवढा विचार करतोस? वाटत नाही'. 
'अरे, मी ही आधी सर्वसाधारण माणूस होतोच की. तुला मानसिकता सांगतो पब्लिकची, सज्जन, चारित्र्यवान, आदर्श माणसांची चरित्र खपतात? समजा त्यांच्यावर फिल्म निघाली तर लोक जातात? नाही जात. कारण ज्यात काही भन्नाट घडत नाही ते लोकांना आवडत नाही. आचरणात आणणं त्यांना जमणारही नाही. हल्लीच्या काळात ऊगाच मनाला टोचणी वगैरे लागली तर? त्यापेक्षा वाईट जास्ती खपतं, बघून मजा घ्यायचीये, तसं वागायची डेअरिंग कुठे आहे? आणि एक गंमत, एखाद्या माणसाला सतत चारी बाजूने लोक बोलत राहिले की त्याला आपोआप सहानुभूती मिळते. आपण तेच एनकॅश केलंय. आपण म्हटलंय का तो इनोसंट आहे? पण तो तसा असण्याची शक्यता आहे हे इतर पात्रं सुचवतात'. 
'ए बाबा, तुझ्याकडून एवढं बौद्धिक नको आता. फोन लावून गल्ला विचार. सहावा दिवस आजचा, आयला आधीच्या सिनेमात पण एवढा गल्ला पाहिला नव्हता आपण पहिल्या दिवशी. काही पब्लिक शिव्या देतंय राव पण आपल्याला. आपल्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती वगैरे.'
'छोड यार, पैसा हवा शेवटी. नावं ठेवणा-यांपेक्षा बघणारे जास्ती आहेत. मिडिया आहे, कुणाचं पोरगं आज बाबा म्हटलं, हागलं याची पण ब्रेकिंग न्यूज असते. 'बदनामही सही नाम तो हुआ' हा आजचा फंडा आहे. हाच आठवडा आहे कमवायचा. नंतर चॅनलवर येईल ते छनछनराम वेगळे, कंटाळणार बघ मग लोक. आपल्याला दुस-या सिनेमाची तयारी करायला हवी आता'. 

'एवढ्यात? तुझ्या डोक्यात आहे का काही थीम'?
'डोक्यात? कालच फोन आलेत, एका निष्पाप, निरागस माणसावर सिनेमा करायचाय. सतत 'प्रेम' वाटणारा माणूस आहे. तीनशे प्लसचा आकडा असू शकेल त्याच्याकडेपण. अतिशय ह्यूमन माणूस आहे. अरे प्राणिमात्रसुद्धा त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्यावर होणारे सततचे आरोप ऐकून एका काळविटाने आत्महत्या करून स्वतःचा काळ ओढवून घेतला. चुकून गाडी चढली फुटपाथवर त्याला काय करेल सांग तो, बरं तो चालवत होता असा पुरावा नाही, असला तरी दाखवायचा नाही. आपल्यासारखंच रे, जेवढं सोयीस्कर आहे तेच दाखवायचं पब्लिकला. मला सांग, आपण वाईट का म्हणा कुणाला. समस्त तरुणी आणि आता काकवा वयाला पोचलेल्या त्याच्या वयाच्या बायकांनाही तो क्यूट वाटतो, त्याच्यावर भाळतात मग काय फक्तं आपण मक्ता घेतलाय का संस्कारांचा. त्या तुकाराम ओंबाळेंवर काढ फिल्म, तीन शो पण नाही चालणार'. 
'ए बाबा, तुझ्या डोक्यात आहे की काय तो सिनेमा काढायचं? सगळा गल्ला घालवशील आणि फक्तं पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारीला दाखवतील चॅनल्सवरून, बाकी काय शष्प नाही मिळणार त्यात'. 
'छे रे, पागल कुत्तेने काटा है क्या? हे फक्तं मुलाखतीत, कॅमेरासमोर बोलायचं असतं, करायचं नसतं. बाय द वे, अजून दोन फोन आलेत'. 
'माय माय माय, तू तो 'हिरा' है मेरा! कुणाचे आलेत'. 
'एक हिरे विकणारा आणि एक दारू विकणारा'. 
'मग? त्यांच्यावर काय काढणार सिनेमा'?
'बघशील, पटकथा जवळपास सेम असेल. विनोद, क्लीन चित्रपट, बरी गाणी, इमोशन हा फॉर्म्युला आपल्याला गवसलाय, आधी ते कसे डाग बाळगून आहेत ते दाखवायचं, मग कुणाचंही नाव न घेता टीका करायची, पब्लिकला कन्फ्युज केलं की झालं'. 
'अरे पण फार काळ चालणार नाही एकंच फॉर्म्युला'. 
'पागल आहेस. मलाही माहितीये, कधी थांबायचं हे कळलं की झालं, नासिर हुसेन, मनमोहन देसाई एकाच थीमवर काढायचे की नाही सिनेमे, पॅटर्न ठरलेले असायचे, महेश कोठारे घे, वर्षानुवर्षे एकंच पॅटर्न. आपण एवढे दोन सिनेमे केले की थांबूयात. तू कशी मला संधी दिलीस आणि स्वतः बंद झालास, नंतर आपण दोघं मिळून ते करूयात. नवीन माणूस धरू, बॅनर आपला. तो माणूस पण ऋणात रहातो, आपल्याला पैसे आणि मोठेपणा मिळतो. मागचं कोण लक्षात ठेवत नाही इथे, पब्लिक मेमरी इज शॉर्ट. आणि आपल्याकडे 'डाग अच्छे है' म्हणणारे आणि ते अभिमानाने मिरवणारे लोक काय दुर्मिळ आहेत का? एक धुंडो, हजार मिलेंगे! विनू, अच्छाई की हद होती है, बुराई की नहीं!.  

'अरे पण ज्यांनी या व्यक्तींमुळे भोगलंय त्यांचे पण फोन आले होते रे मला, तळतळून बोलत होते'. 
'आपण ऐकून घ्यायचं फक्तं. मत नसतं व्यक्तं करायचं आणि अजून एक आयडिया आहे. नफ्यातला काही हिस्सा दान करायचा काही वर्षांनी, पब्लिक लगेच चांगलं म्हणतंय बघ आपल्याला, प्लस लाभार्थी म्हणजे आपली भलामण करणारे लोक वाढतात ते वेगळंच. आणि झूठ असतं रे सिनेमा बघून पब्लिक बिघडतं हे, 'माफीचा साक्षीदार', 'पुरुष' बघताना लोकं नानाच्या एंट्रीला टाळ्या वाजवायचे यात दिग्दर्शकाची किंवा नानाची काय चूक आहे सांग? पब्लिकची बुद्धी आहे तसेच चित्रपट ते बघणार आणि आवडणार त्यांना. खाली काय सबटायटल टाकायचं का दारू, तंबाखूचं टाकतात तसं, 'हा व्हिलन आहे, याचा द्वेष करा' असं'. यांच्या घरी काय संस्कार झाले नसतील का? पण समाजच असा झालाय, वाईटाची ओढ जास्ती आहे प्रत्येकाला. हिरो कोण, आदर्श कोण, वाईट काय हे काय समजत नाहीये का? समजतं पण इन्स्टंट यश हवंय, वासना, अधिकार, सत्ता, पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी गोचीडासारख्या चिकटल्यात या पिढीला. आपण काय मक्ता नाही घेतलेला. छान पैसे कमावू. बाहेरचं नागरिकत्व घेऊ, मुलंबाळं तिकडेच रहातील. वय झालं की 'फाळके पुरस्कार' स्वीकारायला काठी टेकत येऊ. नाहीच मिळालं ते तर गेलाबाजार 'पद्मश्री' सेफ आहेच, कुणालाही मिळतं. पैसे देऊन दोन चार चॅनल्सवर 'लाईफ टाईम घेऊ', हाय काय नाय काय'.  
'धन्यं आहेस राजा तू. एवढा विचार मी पण नव्हता केला कधी'. 
'थांब, फोन आलाय'.  

'हॅलो, यस स्पिकिंग. फिल्म बनवायचीये? थ्री पर्सेंट इन प्रॉफिट, नॉट ऑन कलेक्शन, देऊ. माहिती मेल करा, तरी चार वर्ष लागतील, दोन सिनेमे ऑलरेडी फ्लोअरवर घेतोय लवकरच. साधारण काय कॅरॅक्टर आहे. सांगा, लाजू नका, रेकॉर्ड नाहीये करत कॉल'. 
'अरे कट काय केलास ऐकता ऐकता?'. 
'दोन खून आणि फक्तं एकशे ऐंशी कोटीचा बँक घोटाळा. पागल समझा है क्या! वी आर इन अप्पर सर्कल नाऊ! या असल्या लो बजेट थीमसाठी नवा डायरेक्टर शोधायला घे आता तू. 'बायोपिक फिल्म्स लिमिटेड', हाय काय आणि नाय काय'. 
 
जयंत विद्वांस 




Thursday 28 June 2018

चकवा...


चकवा...

अभद्र कथा लिहिल्यावर ब-याच जणांनी भुताखेताचे अनुभव आलेत का कधी असं विचारलं होतं. तसे अनुभव कधीच आले नाहीत. कोकण डोकावत असलं काही कथांतून तरी मी काही फार कोकणात राहिलेलो नाही किंवा तिथले असले अनुभवही नाहीत. सहसा हे अनुभव ऐकीव असतात. ते सांगणा-या माणसाला दुस-या कुणीतरी सांगितलेले असतात. अर्थात कोकणात मी स्वतः पाहिलंय असं सांगणारी पाचपन्नास माणसं सहज मिळतील. 'चकवा' नावाचा एक प्रकार असतो. तुम्ही कुठल्याही मार्गाने गेलात तरी परत तिथेच येता असा प्रकार असतो त्यात अर्थात त्याचे अनेक किस्से आहेत ऐकलेले पण अनुभवलेला एकंच आहे. अर्थात त्याला चकवा म्हणायचं का हे माहित नाही. आता चिंचवड, आकुर्डी कायच्याकाय बदलून गेलं. मी सांगतोय गोष्टं ८६/८७ ची.

पिंपरीला आत्या रहायची. काकांना घेऊन तिच्याकडे गेलो होतो. आकुर्डीला अजून एक जण रहायचे त्यांच्याकडे जायचं होतं. त्यांच्याकडे मी एकदा गेलो होतो आधी. सहसा मी रस्ता विसरत नाही. बजाज ऑटोच्या समोरच्या गल्लीतून गेल्यावर मला कसं जायचं ते माहित होतं. आम्ही बसने उतरलो. सहा साडेसहा वाजले असतील. एका गल्लीतून गेलो तर समोर रेल्वेलाईन आली. त्यांच्या घरी जाताना ती लागायची नाही हे कन्फर्म होतं. मागे आलो, अलीकडच्या गल्लीत शिरलो, परत रेल्वेलाईन. असं अजून एकदा झालं. मग रिक्षास्टॅन्डला गेलो. विठ्ठलमंदिराजवळ एवढंच माहित होतं. तो म्हणाला, दोन आहेत, खालचं की वरचं? आता आली का पंचाईत. तोवर अंधार पडलेला. काका म्हणाले, राहू दे, सकाळी येऊ. आम्ही परत पिंपरीला आलो. बसमधे येताना त्यांनी मला चकवा प्रकार काय असतो ते सांगितलं. रिक्षेवाल्यानी आम्हांला नक्कीच गंडवलं असतं आणि फिरवून पैसे काढले असते. आम्ही एका संकटातून वाचल्याचा आनंद झालेला मला.

आम्ही सकाळी परत निघालो बसने, बजाज ऑटोला उतरलो. समोरच्या गल्लीत गेलो. तिथून दहा पंधरा मिनिटात चालत त्यांच्या घरी गेलो. झालं काही नव्हतं, अंधारात मी बस थांबली त्या समोरच्या गल्लीत शिरल्यामुळे खरंतर रेल्वेलाईन आली होती. पलीकडच्या गल्लीत जायच्या ऐवजी दोनदा अजून अलीकडच्या गल्लीत शिरल्यामुळे रेल्वेलाईन आली. तेंव्हा आणि आताही हसू येत असलं तरी सलग तीनवेळा रेल्वेलाईन, अंधार, निर्मनुष्यं रस्ता वगैरे अनुभव थ्रिलिंग होता. अनुभव हे नेहमी ऐकायला थ्रिलिंग असतात, ते जो अनुभवतो त्याची काय फाटलेली असते ते त्याचं त्यालाच माहित. माझ्या सास-यांच्या बाबतीत असं झालं होतं. ष्टोरी ऐकताना लय भारी वाटतं पण आपण स्वतःला त्याजागी बघितलं की घाम सुटतो. गणपती पुळ्याच्या रोडला एका गावात ते पूजा की कायतरी कामाला गेले होते. बरोबर अजून चारपाचजण होते. बाकी माणसं पाच वाजेस्तोवर आपापल्या घरी पण आली. कोकणी माणूस गप्पिष्ट त्यामुळे कुठे गप्पा मारत असतील उभे म्हणून फार फॉलोअप नाही झाला. सात, आठ वाजले तरी पत्ता नाही मग फोन झाले. बाकीची माणसं कधीच घरी आली म्हटल्यावर सासूच्या मनात नाय नाय ते. त्यात तुफ्फान कोकणातला पाऊस. एकटी बाई कुठे जाणार रात्री शोधायला. ज्यांच्या घरी गेले होते, ते म्हणाले आमच्याकडून दुपारीच गेले.

मग माणसं गेली दुस-या दिवशी सकाळी शोधायला. बरं शोधायचं कुठे. निर्मनुष्यं जंगलं जास्ती. दुस-या दिवशी संध्याकाळी चार वाजता एक पोरगी म्हणाली, एक म्हातारबा बसून आहेत तिकडे झाडाखाली. मग ते सापडले आणि घरी आणलं. एसटीच्या रस्त्याला येताना त्यांची पायवाट चुकली आणि ते जंगलात जात राहिले. त्यात मिट्ट काळोख आणि तुफान पाऊस. एका झाडाखाली ते रात्रंभर बसून होते पावसात भिजत. पोटात काहीही नाही. बरं, दुस-या दिवशी काय करावं ते सुचलंच नाही त्यांना. झपाटले गेले असा सगळ्यांचा सूर होता. त्यामुळे ते एकाच जागी रात्रंभर भिजून तसेच बसून होते. घरी आणल्यावर कोकणातले सगळे उपाय करून झाले. पण तेंव्हापासून त्यांची तब्येत ढासळत गेली ती शेवटपर्यंत. त्यांच्या स्वभावात पण बराच फरक पडला. नक्की काय झालं असेल ते त्यांच्या गावच्या झोळाईला माहित.

भुतंखेतं आणि त्यांचे अनेक प्रकार या गोष्टी वाचायला, चघळायला, तिखटमीठ टाकायला सुरस असतात. अनुभवतो तो माणूस हे सगळं विसरत असणार त्यावेळी. मग देवगण आहे की मनुष्यगण, आज अमावस्या की पौर्णिमा वगैरे गोष्टी या फक्तं त्यातून सुटका झाल्यानंतरच्या खमंग चर्चेसाठी असतात. अभद्र लिहिताना ते एक बरं असतं, आपण अनुभवण्याची गरज नाही, ऐकीव माहितीवर किंवा वाईट सुचण्यावर आपल्या कल्पनेचं कलम केलं की जमतंय.

चकवा, वाचायलाच बरा, अनुभव नको रे बाबा.

जयंत विद्वांस



Wednesday 27 June 2018

आदर्श...

एक तिरंदाज सरावासाठी जंगलात जातो. बघतो तर अनेक झाडांवर गोल आणि त्याच्या मध्यात अचूक बाण मारलेले. आश्चर्याने त्याने चौकशी केली तेंव्हा त्याच्यासमोर एका मुलाला आणून उभं केलं गेलं.
'काय रे, कसा काय एवढा अचूक नेम साधतोस?'

'मी आधी बाण मारतो आणि मग त्याच्याभोवती वर्तुळ काढतो'.

तो पोरगा आदर्श आहे आपला. पोस्ट चांगली जमली तरंच टाकायची अन्यथा बाद करायची म्हणजे मग 'नेहमीप्रमाणे अप्रतिम' अश्या कॉमेंट्स येण्याची दाट शक्यता असते.

आधी वर्तुळ काढून मग बाण मारायला जमेल तेंव्हा जमेल, तोपर्यंत....

:P  :P :P

जयंत विद्वांस

Thursday 24 November 2016

नाव...


'What's in a name' अर्थात 'नावात काय असतं' असं विल्यमपंत त्यांच्या 'रोमिओ ज्युलिएट' नाटकामधे म्हणून गेलेत. एकूणच पुण्यात रहाणारी माणसं, (रहाणारी म्हणजे जन्माला आल्यापासून रहाणारी, बाहेरून आलेले रेफ्युजी यात मोडत नाहीत), दुस-याचं विधान जगप्रसिद्ध असलं तरी त्याला तोडीसतोड काही सापडतंय का बघतात किंवा त्याला निरुत्तर करणारं काहीतरी शोधतात. आनंदीबाईंचा वारसा सांगत मी फक्तं 'अ' चा 'न' केला आणि प्रतिप्रश्न तयार. विल्यमराव, नावात काय नसतं?. गंमतीचा भाग सोडून देऊ. पण जन्माला आल्यावर सगळ्यात मोठं कार्य काय तर नाव शोधणे. लगेच शोधमोहीम चालू होते. आधी अभिमन्यू अवस्थेत असताना आपल्या कानावर चर्चा पडत असाव्यात पण नंतर लक्षात रहात नाहीत एवढंच. जन्माला आल्यापासून आपण परस्वाधीन असतो. आपल्याला काय हाक मारली तर आवडेल प्रश्नाचं उत्तर देण्याएवढी अक्कल आल्यावर खरंतर नाव ठेवायला हवं. पूर्वज किंवा मागच्या पिढीच्या कुणाचं नाव चिकटवून आठवण तेवती ठेवणं हे सगळ्यात सोपं काम.  

पत्रिका आली की शुभाक्षरानुसार शोधमोहीम चालू होते. काहीच्या काही अक्षरं असतात. एकाला ठा अक्षर होतं. त्यामुळे त्याचं नाव ठामदेव ठेवलं होतं. अर्थात देव आणि मंडळी नाराज होऊ नयेत म्हणून. आता गुगल याद्या देतं अर्थांसकट, कित्त्येक नावं ऐकलेलीही नसतात. पण श्रीमंतांच्या पोरांची असली तर त्याला अर्थ असतो. 'कीया', 'वालीनी' ही मुलींची नावं आहेत हे समजल्यावर मी हैराण झालो होतो. 'मी शोधली' असं मुलीच्या काकानी सांगितल्यावर मी म्यूट झालो होतो. तयार केली असं म्हणायचं असावं त्याला कदाचित. त्यांच्याकडे ऑडी आणि बीएमडब्ल्यू होती त्यामुळे नाव काय का असेना. पण काळानुसार नावं बदलत जातात. पूर्वी देवलोक चार्टला अग्रभागी असायचे. बाप्यांसाठी शंकर, मारुती, राम, कृष्ण, विष्णू आणि इतर देवलोक, मुलींसाठी देव्या, फुलांची, नद्यांची नावं असायची. राम, श्रीराम, सीताराम, आत्माराम, जगन्नाथ, विष्णू, विठ्ठल, बाळकृष्ण, बळवंत, श्रीकृष्ण, राधाकृष्ण, शंकर, महादेव, हनुमान, मारुती, बजरंग, मग देवांचे इतर नातेवाईक यायचे, लक्ष्मण अँड ब्रदर्स, बलराम, मेघनाद, अभिमन्यू. मुलींसाठी सीता आणि तिची अनेक नावं, देव्यांमध्ये अंबा, लक्ष्मी, रेणुका, गौरी, नद्यांमध्ये गोदा, कृष्णा, भीमा, कावेरी, इतर नातेवाईकमधे कौसल्या, द्रौपदी, उर्मिला, राधा, सत्यभामा, रुक्मिणी, फुलांमध्ये सुमन, सरोज, पुष्पा, गुलाब. कमतरताच नव्हती. 

रावण, बिभीषण, कुंभकर्ण, दु पासून चालू होणारी शंभर कौरव नावं, वाली, सुग्रीव, गांधारी, कुंती, माद्री, मंथरा, कैकयी, शिशुपाल नावं काही माझ्या ऐकण्यात नाहीत. कौरवांना एकुलती एक बहीण होती दु:शला, ती जयंद्रथाची बायको होती (त्या रवी शास्त्रीच्या वडिलांचं नाव जयंद्रथ आहे) पण तुम्ही कोणत्या पार्टीत आहात त्याप्रमाणे तुमच्या नावाला किंमत असते हे तेंव्हापासून आहे. पूर्वी घरात दिवाळी अंकासारखी दरवर्षी पोर व्हायची त्यामुळे आत्याच्या, मावशीच्या, आजीच्या आवडीचं नाव एकेकाला देता यायचं. बाळाला आणि त्याच्या आईला कोण विचारतंय तेंव्हा. मग ती आई आपली तिच्या आवडीचं नाव लाडानी हाक मारायची. विनासायास देवाचं नाम (आपलं नाव असतं, देवाचं नाम असतं, संपला विषय) घेतलं जातं हाक मारताना म्हणून देवादिकांची नावं ठेवली जायची . पण म्हटलं ना आर्थिक परिस्थितीनुसार नाव बदलतं. रामचा रामभाऊ होतो किंवा राम्या होतो. मनोहरला पंत चिकटतं नाहीतर मग मन्या होतो. तुमची पत ठरवते तुमचं नाव किती पूर्ण हाक मारायचं ते. बाळ्या, पैसे असतील तर बाळासाहेब होतो आणि दरारा असेल तर 'बाळ' हे सुद्धा नाव चालतं मग. :)

काळानुसार नावं बाद होतात. आमच्या एका मित्राला त्याचं नाव वासुदेव असल्याचा भयंकर राग होता. घसघशीत नावं केंव्हाच बाद झाली. पद्मनाभ, पद्माकर, जानकीदास, द्रुष्टद्युम्न, सात्यकी, मदन, बब्रुवाहन, हणमंत, श्रीकृष्ण, सीताराम, वामन, केशव, आत्माराम, पुरुषोत्तम, अच्युत, बाळकृष्ण, धोंडो, दत्तो, गोदावरी, द्रौपदी ही नावं आता दुर्मिळ. नविन नावं जास्ती आकर्षक आहेत. इरावती, प्रियदर्शिनी, संजीवनी, इंदिरा, मल्लिका, प्रियंवदा ही नावं मला कायम आवडत आलीयेत. ती ग्रेसफुल वाटतात मला. पण आता सगळं कमीतकमी शब्दात काम. दोन किंवा तीन अक्षरी नावं. ओळखीतल्या एका मुलीचं नाव कादंबरी होतं. जेमतेम पॅम्प्लेट वाटेल इतकी बारीक होती बिचारी. नावाला अर्थ असतो ना? 'आमची कादंबरी आलीये का हो तुमच्याकडे?' 'तक्रार नोंदवायचीये, आमची कादंबरी हरवलीये दुपारपासून' अशी वाक्यं ऐकणारा माणूस आ वासेल आधी. वेगळेपणाचा हट्टापायी नाव ठेवताय फक्तं. गावसकरनी त्याचे आदर्श 'रोहन कन्हाय', एम.एल.जयसिंहा' आणि मेव्हणा 'गुंडप्पा विश्वनाथ' यांची मिसळ करून मुलाचं नाव रोहनजयविश्व ठेवलं पण पुढे पडद्यावर फक्तं रोहनच आलं, ते तीन आणि मधे बापाचं नाव असून पण त्याचा त्याला फायदा काही झाला नाही. मिथुननी स्वतः आणि मोहंमद अलीची भेसळ करून मुलाचं नाव मिमोह ठेवलं होतं. अरे, हाक मारायला तरी जमतंय का ते नाव.        

अपभ्रंश करण्यात तर आपण वाकबगार आहोत. एवढं सुंदर नाव असतं पण जवळीक झाली की किंवा आहे हे दाखवण्यासाठी एरवी जास्ती अपभ्रंश होतात लगेच. अव्या, सु-या, नित्या, रव्या, नंद्या, अथ्या, नच्या, सुन्या, संज्या, मुक्या, दिल्या. मूळ नावं काय स्वस्तं होती म्हणून मोठी ठेवली होती का? फारीनात जॉन्या, मायकेल्या, अंद्र्या, बराक्या. मॅथ्यूड्या, रॉबन्या अशा हाका कुणी मारत असतील असं वाटत नाही. मुलींना सुद्धा पुष्पे, सुमे, धुरपे, कुमे, प्रभे, गोदे, कृष्णे हाका असायच्या. पण आजीनी अशी नातीला मारलेली अपभ्रंशित हाक मात्रं मला कायम कानाला गॉड वाटत आलीये. म्हणून घरात माणसं असावीत खूप. सगळी तुमच्या जन्माच्या आधीची असावीत. प्रत्येकजण तुम्हांला कागदोपत्री नावापेक्षा लाडानी काहीतरी नाव देतो, मजा असते त्यात. समजा दहा बारा वर्षाची सुमी परकर पोलक्यातली एक चुणचुणीत मुलगी आहे, तिला अशी भरल्या घरात किती नावं असतात बघा. आजी कार्टे म्हणते, आजोबा लबाडी कुठेय म्हणतात, काका तिला गोपीचंद, बंड्या म्हणतोय, भाऊ तिला ताई म्हणतोय, मोठा असेल तर सुमडी कोमडी  म्हणतोय, आई सुमे म्हणते, बाबा तिला उगाचच महाराणी असल्यासारखं सुमाताई म्हणतायेत. वय कितीही वाढू देत पण त्या नावासरशी ती हाक मारणारा माणूस न बघता आठवतो. 

नावात काय असतं? काहीही नसतं पण ते धारण करणारा माणूस स्वकर्तुत्वाने त्याला योग्यं ठरवतो तेंव्हा ते अचूक आहे असं वाटायला लागतं. अमिताभ म्हणजे अमित है आभा जिसकी. नो लिमिट्स. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे इतकं साधं आणि अनाकर्षक नाव बाळगणारा माणूस, उत्तम पुरुषाची सगळी लक्षण बाळगून होता. सचोटीने, स्वकर्तृत्वावर पैसा जमवला, दान केला. धोंडो केशव कर्वे इतकं जुनाट वाटणारं नाव धारण करणारा माणूस काळाच्या पुढचं काम करत होता. ग्लॅमरस जगात अजिबात न शोभणारं 'नाना' असं एरवी चारचौघात हाक मारण्यासाठी वापरलं जाणारं नाव घेणारा माणूस त्याच सामान्यं नावाची दहशत टिकवून आहे. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे या नावात काय आहे नतमस्तक होण्यासारखं? कार्य असलं की सगळं होतं. त्शेरिंग फिंन्त्सो डेंझोंग्पा हे काय सुटसुटीत नाव आहे का? 'थ्री इडियटस' मधलं फुनसुख वांगडू हे काय आवडण्यासारखं नाव आहे? नावात काय नसतंय, ते आणावं लागतं, स्वकर्तुत्वानी. त्यामुळे विल्यमसाब, आप बराबर है एकदम!

जन्माला आल्यावर मी दोन दिवस सतत रडत होतो म्हणे. जुन्या जाणत्या एक वयस्कं नर्स त्या दवाखान्यात होत्या. त्यांनी आईला विचारलं. घरात कुणी अकाली गेलंय का? वडिलांचे वडील, माझे आजोबा, वडील बारा वर्षाचे असताना गेले, माहिती पुरवली गेली. त्या म्हणाल्या, त्यांचं नाव ठेवा. शांत होईल. मग आज्जीनी कैक वर्षानंतर तिच्या मिस्टरांचं नाव माझ्या कानात घेतलं आणि मी एकदम म्युट झालो म्हणतात. कागदोपत्री जे नाव आहे ते कुणीही हाक मारत नाही, कुणी हाक मारली तरी मी लक्ष देणार नाही कारण अट्ठेचाळीस वर्षं ती कानाला सवयीची नाही. आजोबांच्या नावाचा अपभ्रंश आज्जीला ऐकावा लागू नये म्हणून तिनीच जयंत नाव ठेवलं. मतदान करताना मी आणि वडील पाठोपाठ जात नाही. आधीच आमचं आडनाव एकदम धड आहे, तिथली मठ्ठ माणसं आम्ही डुप्लिकेट मतदान करायला आल्यासारखी संशयानं बघतात.

नाव टिकवण्यासाठी लोकांना मुलगा हवा असतो, तो नाव आणि आडनाव लावतो म्हणून. मला माझ्या आजोबांचं नाव माहितीये. त्याच्या आधीची नावं? कालौघात काय काय पुसलं जातं, आपल्या सामान्य नावाला कोण लक्षात ठेवणारे इथे. आधी आपण नाव ठेवतो मग नावं. नाव घे, लाजू नको (हे कालबाहय झालंय, तरीही), नाव निघालं पाहिजे, नाव काढू नकोस त्याचं, नाव काढलंस बघ, तुझं नाव कमी करण्यात आलं आहे, नावं ठेवायला जागाच नाही काही अशी अनेक कानाला प्रिय, अप्रिय वाटणारी वाक्यं त्या सामान्य नावाशी निगडीत आहेत, एवढं खरं. :)

जयंत विद्वांस

इम्मॉर्टल…


एकोणतीस वर्ष झाली त्याला जाऊन आज. जिवंत असता तर सत्त्याऐंशी वर्षाचा असता तो. ह्रषिकेश मुखर्जी त्याला आणि मेहमूदला घेऊन 'आनंद' काढणार होते. त्याच्या आवाजात 'आनंद'ची गाणी कशी वाटली असती? सुंदरच वाटली असती पण तुमचं ते 'कही दूर जब' मुकेशच्या आवाजात चांगलं आहे असं म्हणावं तर त्यापेक्षा मूळ चाल हेमंतकुमारच्या आवाजातलं 'अमॉय प्रोश्नो करे निल ध्रुवो तारा' जास्ती सरस आहे असं वाटतं. तुलनेला अंत नसतो. पण त्याच्या आवाजात हळवी गाणी जास्ती सुंदर आहेत. अत्यंत प्रतिभावान, विक्षिप्त माणूस. एखादा माणूस का आवडतो याचं नेमकं स्पष्टीकरण देता येत नाही. जे उमगतात ते मन व्यापत नसावेत. त्याची नक्कल करणारे अनेक आले, येतील. पण काही नेमके हळवे शब्दोच्चार (त्याचा 'ह' दुसरा कुणी म्हणत नाही तसा), स्याड व्हर्जन त्याच्या आवाजातच ऐकावीत.

कधी 'फंटूश' मधलं 'दुखी मन मेरे' ऐका कान देऊन. 'पत्थर के दिल मोम न होंगे' ओळ ऐका, 'होंगे'चा 'ह' स्वरयंत्रातून आलेला नाही, हृदयातून आलाय. 'दोस्त' मधलं 'गाडी बुला रही है' ऐकाल. त्यातल्या त्या दोन संथ ओळी अशाच हृदयातून आल्यात. 'आत है लोग, जाते है लोग, पानीके जैसे रेले, जानेके बाद, आते है याद, गुजरे हुए वो मेले' मधला 'गुजरे' ऐका. 'ये क्या हुआ, कब हुआ' चा हसत रडवेला म्हटलेला 'हुआ' ऐका. 'मुकद्दर का सिकंदर'मधे 'रोते हुए, आते है सब' त्याच्या आवाजात येणारच होतं त्यामुळे शेवटी विनोद खन्नाला रफी आला पण मला कायम वाटत आलंय ते त्याच्या आवाजातच पाहिजे होतं. 'शोले' मधे आर.डी.ने तो लफडा ठेवलाच नाही, 'ये दोस्ती' ला बच्चनला मन्ना डे घेतल्यावर आपसूक धर्मेंद्रला तो आला. इतक्यांदा बघूनसुद्धा 'साथी तू बदल गया' ऐकताना काहीतरी होतंच. 'शराबी'तलं 'इंतहा हो गई इंतजारकी' ऐकताना पण असा वेगळाच आवाज कानाला मोहून टाकतो. विनोदी ते गंभीर अशी टोकांची गाणी त्यानीच गावीत.     
    
त्या 'कोई होता जिसको अपना'ला, 'तेरी दुनियासे होके मजबूर चला'ला, 'मेरे मेहबूब कयामत होगी'ला, 'अगर सुन ले तो इक नगमा'ला, 'कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन'ला, 'ओ साथी रे'ला, 'मै शायर बदनाम'ला, 'चिंगारी कोई भडके'ला, 'वो शाम कुछ अजीब थी'ला, 'तुम आ गये हो'ला, 'मेरी प्यारी बहनिया'ला, 'तेरे बिना जिंदगीसे'ला, 'अपने प्यारके सपने सच हुए'ला,  'सफर'चं 'जीवनसे भरी'ला, 'आप की कसम'चं 'जिंदगी के सफर में'ला त्याचा आवाज वेगळा आहे. काय साला पोटातून गायलाय तो. उमाळा आतून यायला लागतो तसा हा आवाज पण आतून येतो. फॉस्फरस जसा पाण्यात ठेवतात तसा हा राखलेला आवाज, पोटात दडलेला. 'माना जनाब ने', 'अरे यार मेरी', 'छोड दो आंचल', चुडी नही ये मेरा', 'चल चल चल मेरे साथी', 'एक लडकी भिगीभागीसी', 'जानेजा, धुंडता फिर रहा', 'तू तू है वही' चा आवाज वेगळा आहे. 'मेरी प्यारी बिंदू', 'ओ मन्नू तेरा हुआ', 'मेरे सामनेवाले खिडकीमें', 'चिलचिल चिल्लाके', 'एक चतुर नार', 'देखा ना हाय रे', 'बचना ऐ हसीनो' चा आवाज वेगळा आहे. 

'जंगल में मंगल'चं 'तुम कितनी खूबसूरत हॊ', 'रात कली', 'सवेरा का सूरज', भारत भूषणचं 'तुम बिन जाऊ कहा', अमेरिकेला जायचं असल्यामुळे बच्चनची एकंच ओळ आधी गाऊन गेलेलं 'परदा है परदा', 'खिलते हैं गुल यहा', 'प्यार दिवाना होता है', 'ये शाम' कशात टाकायची? लताला वेळ नव्हता, रेकॉर्डिंग तर उरकायचंय म्हणून दोन्ही आवाजात गायलेलं 'हाफ टिकिट'मधलं 'आ के सिधी लगी दिलपे' सारखी धमाल परत होणार नाही. गाण्यांची यादी किती देणार. वारूळ फुटल्यासारखं होतं, रांग थांबतंच नाही. मराठीत पुलं आणि हिंदीत हा. यांच्यात मला कायम साम्यं वाटत आलंय. गीतलेखन, अभिनय, संगीतदिग्दर्शन, गायन, लेखन, चित्रपट दिग्दर्शन आणि सोड्याच्या बाटलीसारखा बाहेर येणारा निर्विष, उच्च दर्जाचा कारुण्याची झालर लावून आलेला, टचकन डोळ्यात पाणी आणणारा, सहज, आटापिटा न केलेला विनोद. त्याच्या हस-या मुखवटयामागे दडलेला खरा चेहरा पाह्यचा असेल तर 'दूर गगन की छांवमें' बघा. त्याच्या धीरगंभीर आवाजातलं 'आ चल के तुझे' कधीही ऐका, श्रवणीयच.

त्याच्या विक्षिप्तपणाचे किस्से त्याच्या गाण्यांएवढेच प्रसिद्ध आहेत. योगीताबालीशी लग्नं केलं म्हणून त्यानी काही काळ मिथूनसाठी आवाज देणं बंद केलं होतं. 'लव्ह स्टोरी' साठी कुमार गौरवचा आवाज तो देणार होता. कबूल करूनही रेकॉर्डींगला तो गेलाच नाही, माणूस घ्यायला आला तर त्यानी दरवाजाच उघडला नाही शेवटी आर.डी.नी अमितकुमारला घेऊन काम केलं, याचा हेतू साध्यं झाला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण प्रयत्नं करतोच आपल्या मुलांना पुढे आणायला, ह्याचा खाक्या वेगळाच. अनेक हिरोंची चलती याच्या आवाजामुळे झाली. आराधना हिट नसता झाला तर हा गायन बंद करणार होता. पण सगळी गाणी हिट झाली मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही कधी. रफी, मुकेश, मन्नादा सगळे मागे पडले. यॉडलींगचा आठवा सूर होताच.

कुणीतरी त्याला श्रद्धांजली म्हणून सैगलची गाणी गाण्याचा आग्रह केला होता. काय सुरेख बोलून गेलाय तो. 'मी म्हणणार नाही, मी भिकार म्हटलीयेत असं कुणी म्हणालं तर मला वाईट वाटणार नाही पण मी त्याच्यापेक्षा चांगली म्हटली असं कुणी म्हणालं तर मला वाईट वाटेल'. आदर पाया पडलो म्हणजेच असतो असं नाही, कृतीतून दिसतो तो ही आदरच असतो. पैसे मिळाल्याशिवाय रेकॉर्डिंग न करणा-या या माणसाने राजेश खन्नानी काढलेल्या 'अलग अलग' साठी एक रुपयाही घेतला नव्हता. विक्षिप्तपणा सुद्धा ओरिजिनल हवा, तो मग हवाहवासा वाटतो. आमची ही अनंत कारणांनी काजळली गेलेली चिमूटभर आयुष्यं तू किती सुखाची करून गेलास याची तुला कल्पना नाही. अजूनही तो सतत वाजता आहे. 

सत्तेचाळीस गेलेला सैगल अजून ऐकतो मी, तुला जाऊन एकोणतीस वर्ष झालीत फक्तं. मी मरेपर्यंत तू सोबत असशील. शेवटी तूच लिहिलेल्या, संगीत दिलेल्या, गायलेल्या, अभिनीत केलेल्या वर्णनाच्या ठिकाणीच जाणार, मी काय किंवा अजून दुसरा कुणी काय :

'आ चल के तुझे,, मै लेके चलू एक ऐसे गगन के तले 
जहां गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले'


आहे का रे खरंच असं सगळं तिथे? तरच मजा आहे तिथे येण्यात, नाहीतर मग मेलो काय आणि जगलो काय, फरक शून्यं.

जयंत विद्वांस 

त्यात काये एवढं काळजी करण्यासारखं?...

टू व्हीलरवर मी आणि क्षमा रग्गड हिंडलोय, आधी स्प्लेंडर आणि मग फिएरो. अष्टविनायक, कोल्हापूर, अलिबाग, बोरवाडी, रोहा (याचे भयावह किस्से परत कधी) महाबळेश्वर, डोंबिवली, बदलापूर अनेकवेळा. सातारा रोडनी खंबाटकीपर्यंत सा.बां.मंत्री असल्यासारखे पण आम्ही जाऊन यायचो. घाट चढायचा, येताना बोगद्यातून यायचो. एकदा क्षमा डोंबिवलीला गेलेली. मला खाज भयंकर, म्हटलं तू बदलापूरला ये, मी इकडून येतो. सकाळी जनरली लवकर निघायचो मी. तेंव्हा मोबाईल नव्हता. गाडीचं डिझाईन करताना त्यात एरोडायनॅमिक्स असतं म्हणे. वा-याला कापताना स्पीड कमी होत नाही म्हणजे. मी स्पीडला मि.इंडिया सारखाच होतो जवळपास, वारा अडेल असा देह नव्हताच मुळी त्यामुळे गाडी विनाअडथळा बुंगाट जायची. सर्व्हिसिंग करून आणलेलीच होती. सकाळी खारदूंग ला ची मोहीम असल्यासारखा निघालो. ब्लॅक जर्किन होतं माझ्याकडे थ्री पीस सुटसारखं. त्याच्या सगळीकडच्या चेन लावण्यात एक किलोमीटर जाईल माणूस.    

तर साडेपाच पावणेसहाला निघालो असेन. अंधारच होता. डिसेंबर असेल. हाफ किक स्टार्ट झाली गाडी. पहिला स्टॉप देहूरोड फाटा असं ठरवून निघालो. टर्नला पायावर पाणी पडल्यासारखं झालं. म्हटलं असेल. सारसबाग ओलांडली तेंव्हा एकदा गाडी बुकबुक झाली, म्हटलं असेल, निलायमच्या पुलाखाली गाडीनी व्हेंटिलेटर सपोर्ट काढलेल्या पेशंटसारखा सरळ रेषेचा मॉनिटर दाखवून मान टाकली. मी हैराण, गाडी कडेला घेतली.  चोक दिला, ऑनॉफचं बटण उगाच ऑनॉफून बघितलं चारवेळा. गाडी पुलंच्या एसटीसमोर आलेल्या म्हशीसारखी ढिम्म. मागून एक टू व्हीलरवाला आला. 'मालक, पेट्रोल सांडतंय' म्हणाला आणि पुढे गेला. मी खाली बघून गार पडलो. तालिबानी व्हिडिओत मान कापतात तशी पेट्रोलची ट्यूब टाकीच्या खालच्या पायपापासून सुरी फिरवल्यासारखी तुटलेली. एक लिटरभर पेट्रोल गेलं असेल इंजिनाभिषेकात. आता आली का पंचाईत. मग मी लहानपणापासून खूपच हुशार असल्यामुळे पहिल्यांदा कॉक बंद केला (याला डॅमेज कंट्रोल असं म्हणतात). सकाळी सहाला कोण मिळणार गॅरेजवाला आणि ते ही पुण्यात. नवीपेठेत दिक्षीतांचं एमबी गॅरेज होतं माहितीचं. त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आमचा अनंत सावरकर रहातो. 

मी एका पायानी लहानपणी ती पायानी ढकलत गाडी खेळतात तसं फिएरो ढकलत नवीपेठ गाठली. जर्किनमुळे अंगातून घाम. म्हटलं आठला उघडेल, तोपर्यंत सावरकरकडे जाऊ. पावणेसातला देणेक-यासारखा रविवारचा दारात त्याच्या. ते बिच्चारे झोपी गेलेले जागे झाले. माझी स्टोरी सांगून झाली. मी चक्कर येऊन पडलो तर पुढचे उपद्व्याप करायला लागतील या भीतीनी बहुतेक दोन लाडू पण दिले त्याच्या बायकोनी पोहे होईस्तोवर. लहान मुलं शाळेत ती गुबगुबीत ससा वगैरे होतात ना त्यात चेह-यावर आतला मुलगा किती बारीक आहे ते कळतंच, तसा मी दिसत असणार जर्किन मध्ये. त्याच्या बायकोनी चेहरा वाकडा न करता भन्नाट पोहे केले, चहा झाला. 'आता जेवायला थांबतो की काय हा' अशा अर्थाचं त्यांनी एकमेकांकडे बघायच्या आत मी निघालो. गॅरेजला लागून असलेल्या टपरीवाल्यानी सांगितलं, ते साडेनऊपर्यंत येतात. मी पर्वती पायथ्याला शेलार टीव्हीएसकडे गाडी टाकायचो, म्हटलं चालत गेलो तरी परत येईन नवाच्या आत. निघालो. ते जर्किन वेटलॉसच्या जाहिरातीत खपलं असतं असा घाम काढायचं. साडेआठला त्याच्या दरवाज्यात उभा. 'संडे क्लोज्ड' ची लाल पाटी बघून तिथेच पायरीवर मटकन की काय तसा बसलो. वधस्तंभाकडे निघालेल्या चारुदत्तासारखा परत चालत नवीपेठ. 

साडेनवाला एमबीचा एक कामगार आला. माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यानी झाडलोट, सडासंमार्जन, उदबत्ती सोपस्कार पूर्ण करेपर्यंत मी बिनकुत्र्यांच्या दत्तासारखा तिथे झाडाला टेकून उभा. 'एवढंच ना, आलोच' म्हणून तो फरार झाला. साधारण वीसेक मिनिटांनी आला. 'सायेब, फिएरोची ट्यूब मिळत नाहीये'. हातात कमीत कमी सोळा सत्रा आणि वीस बावीसचा पाना हवा होता. दोन्ही कान हाणले असते. 'अरे पेट्रोल ट्यूबला काय करायचीये फिएरोची ओरिजिनल, कुठलीही लाव'. मग तो परत गेला आणि राहुलकुमार बजाजचा टर्नओव्हर वाढवून आला. एक मीटर आणलेली त्यानी. मी एक तुकडा लावून अजून एक स्पेअर घेऊन ठेवला. सगळं आवरून निघायला साडेदहा झाले. निघालो. इथे पुणे लोकेशन सीन संपला. 

कट टू बदलापूर. मी सहाला निघणार म्हणजे साडेनवाच्या आत पोचणार म्हणून बायको दहापर्यंत हजर. मग अकरा, बारा, साडेबारा, एक वाजला. आमच्या आशा काळेनी घरी फोन केला. आई म्हणाली मी सहाला गेलोय. जीए, मतकरी, धारप एकापाठोपाठ एक प्रत्येकाच्या डोक्यात हजर. आता काय ऐकावं लागतंय नी काय नाही. बायकोनी भांड्यात पाणी रेडीच ठेवलेलं गणपतीला ठेवायला. मैं दुनियासे बेखबर निवांत आलो दीडला. खाली गाडी लावली तर वर बाल्कनीत काका, काकू आणि अर्धांग उभं. वरूनच ड्रॅगनसारखे फुत्कार आणि जाळ खाली यायला लागले. मग मी पीसीओवरून घरी फोन केला. वर गेलो. मुकाट जेवलो. जेवताना रेडिओवर दुपारच्या संथ बातम्या लागतात तसा वृत्तांत सांगितला. अंधार लवकर पडतो म्हणून लगेच साडेतीनला बायकोला घेऊन निघालो. 'नीट चालवणार, रस्त्याच्या कडेकडेनी, साठ मॅक्सिमम स्पीड' अशी शपथ घेऊन झाली. 

कॉर्नरला गाडी वळल्यावर मग हाणायला घेतली, 'तुला गरजच काय घरी फोन करायची, उगाच तिकडे आणि इकडे टेन्शन'. पण मागून अस्पष्ट हुंदका ऐकायला आल्यासारखं वाटलं आणि मग मिसाईल कानावर आलं, 'काळजीनी फोन केलाय, मी आहे म्हणून एवढं तरी केलंय, मला उशीर झाला असता तर तूम्ही कॉटवर पडूनच सांगितलं असतंत 'ती काय लहान आहे का, येईल, त्यात काये एवढं काळजी करण्यासारखं?' मी निदान तसं तरी नाही केलेलं'. गाडी चालवताना ड्रायव्हरनी कुण्णाशी बोलायचं नसतं त्यामुळे गप्प बसलो आणि सुखरूप घरी पोचलो. 

जयंत विद्वांस 

या परत ...


नुकतीच गाडी घेतली होती तेंव्हा, सेकंडहँड स्प्लेंडर. बरीच वर्ष लायसन्स नव्हतंच. रम्या म्हणाला, 'साखरवाडीला जायचं का, लोणंदजवळ, उद्या लग्नं आहे, दुपारी परत येऊ'. त्याची सासुरवाडी होती ती. दीड दोन तास लागतील म्हणाला फारफार. डिसेंबर होता. सहालाच अंधार व्हायचा. साडेपाचाला निघालो, हडपसरला पेट्रोल भरलं, बार भरला आणि निघालो. दिवेघाटातच थंडी वाजायला सुरवात झाली होती. स्प्लेंडरचा हेडलाईट म्हणजे एकदम पॉवरफुल काम. चाकाच्या पुढे उजेड असल्यासारखं जाणवेल इतपत तीव्र प्रकाश. अरनॉल्ड असल्यासारखा फक्तं हाफ स्वेटर घातलेला आणि वीसेक रुपयात मिळणारे पिव्वर लेदरचे रेक्झिनचे ग्लोव्ह्ज. ते काही लायकीचे नाहीत हे घाटात बोटं गार पडल्यावर लक्षात आलं. जेजुरीच्या पायथ्याशी चहा प्यायला, अग्निहोत्र केलं, परत बार भरला आणि बुडाखाली १००० सीसी असल्याच्या थाटात निघालो.

स्प्लेंडर का असेना पण समोरून ट्रक आला की ऐकायला जाणार नाहीत अशा शिव्या देऊन डीपर डिमर स्टाईल वगैरे एक नंबर आपली. कडेनी अंधार तुफान, माझा एक टाका थंडी आणि अंधारानी उसवला होता. एकदा डीपर डिमर दिल्यावर असं लक्षात आलं की लाईट ऑफ होतोय. थांबून ट्रायल घेतली तर एकानी मान टाकली होती. मॅक्स पाच फुटावरचं दिसत होतं. आहे तो पण बल्ब गेला तर रस्त्याच्या कडेला बसायला लागलं असतं. कडेला शेती आहे, माळरान आहे की स्मशान आहे काहीही कळणार नाही असा अंधार. मग मागून एखादा ट्रक आला की त्याच्यामागे, कार मागे काही काळ कुत्रं धावतं, तसे स्पीडनी जायचो. आम्हांला घाबरून तो पुढे पळाला की आम्ही स्लो. रम्याला दहावेळा विचारलं की अरे कधी येणार. रम्या पण गूगल मॅप एकदम. लोणंदच्या आधी पहिला लेफ्ट म्हणाला. एक पूल लागतो तो ओलांडला की लेफ्टायचं. म्हणजे लोणंदला जायचं, मागे यायचं आणि राईटला वळायचं. कित्ती इझी. अनेक पूल गेले. लगेचचा लेफ्ट काही येईना.

रस्त्यात एका स्पॉटला दोन पोलीस अडथळे लावून शेकोटी करत बसलेले. दुसरा टाका उसवला. लायसन्स नाही त्याचे पैसे द्यावे लागणार. पण त्यांनी आमच्याकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. टाका परत जागेवर. शेवटी एका पुलापाशी रम्या ओरडला हाच तो लेफ्ट. वळलो, पोचलो. मग एका उसाच्या ट्रॉलीमागून बार्शीलाईटच्या स्पीडनी साखरवाडी गाठलं. लोणंदला लग्नं होतं. सकाळी लोणंदला येऊन लग्नं लावलं. जेवायला थांबण्यात अर्थ नव्हताच म्हणून लवकर निघालो. हा भंगार आहे, हा भिकार दिसतोय असं म्हणत ढाबे रिजेक्ट करत जेजुरी ओलांडली. अडीच तीन झाले असतील. आग पडलेली त्यामुळे दिसलेल्या पहिल्या ढाब्यावर गाडी लावली. अघळपघळ काम होतं. खंडहर बघायला येतात तसे आम्ही दोघेच होतो उभे. दोन मिनिटांनी मग दहाबारा वर्षाचा मुलगा आला. म्हटलं हा बहुतेक बंद झाला ढाबा सांगणार. भूक लागल्यामुळे बसलो. 'काय काय आहे रे?' 'शेठ, तुम्ही मागाल ते'. पोरानी पहिल्याच फटक्यात आडवा केला मला.

झेरॉक्स काढून प्लास्टिकमध्ये घातलेलं केलेलं मेनूकार्ड टाकलं त्यानी. फक्तं जेवण होतं म्हणून मुद्दाम 'बिअर नाही का रे' विचारलं. 'कुठली हवी, सांगा नुसतं'. पोरगं चलाख होतं यात वादच नाही. त्याला पैसे देऊन दोन खजुराहो आणायला सांगितल्या. साडेतीन मिनिटात पोरगा चिल्ड बाटल्या घेऊन अवतीर्ण झाला. गावरान चिकन आहे म्हणाला. आम्ही शहरातले शहाणे. त्याला म्हटलं, 'लेका, आतून गरम करून आणणार राहिलेलं आणि आत्ता केलंय म्हणणार'. 'शेठ, कोंबड्या फिरतायेत ना त्या सगळ्या आपल्याच आहेत, बोट दावा, पकडतो आणि या माझ्या मागे, तुमच्यासमोर मान कापतो'. मी परत गार. बरं या सगळ्या बोलण्यात बनेलपणा अजिबात नाही, प्युअर इनोसंस. म्हटलं वेळ लागेल रे, आधीच भूक लागलीये, राहू देत. 'बसा ओ शेठ, रस्सा देतो बिअरबरोबर'. त्यानी मोठी ताटली भरून काकडी, टोमॅटो, चार पापड तळून, फरसाण आणून ठेवलं. आम्ही अजून एक बिअर आणायला लावली. 'ह्या संपत आल्या की सांगा, गरम होईल उगाच'. पोरगा मला आवडायला लागला होता. आधीच मला बिअर म्हणजे ख्यालगायकी होती, निवांत काम असायचं. दोघातल्या तिस-या खजुराहोपर्यंत तास निघाला. पोरानी गरम गरम मिठाचा दाणा टाकलेलं, मिरची लावलेलं चिकनचं ते गरम सूप आणलं. त्या चवीला शब्द नाहीत. इकडे थंडगार आणि वाटीतून आग नुसती. पाचेक वाट्या तरी हाणल्या मी.

नंतर त्यानी जेवण आणलं. तसा चिकनचा रस्सा मी परत खाल्लेला नाही. बकासुरासारख्या तीन मोठाल्या भाक-या आणि नंतर टेकडीसारखा भात हाणला मी रस्सा घालून. आम्हांला देताना त्यानी प्लेटचा हिशोब लावलाच नव्हता. तुडुंब भरलो. त्या दिवशीचा 'अन्नदाता सुखी भव' आशिर्वाद अतिशय खरा आणि मनापासून होता. आम्हांला मागायला लागतच नव्हतं, त्याआधीच तो वाढायचा. बरं सॅलडचे पैसे त्यानी घेतलेच नाहीत. तो ज्या तृप्तं नजरेने बघत होता ना कडेला उभं राहून ते बघणं त्याच्या वयाच्या पटीत होतं. वीसेक वर्षांपूर्वीचं बिल, कितीसं असणार ते. रम्याला म्हटलं त्याला पैसे देऊ. जेवण झाल्या झाल्या टेबल लगेच साफ. पोरगा फक्तं शाळेत शिकलेला नव्हता पण सर्व्हिस इंडस्ट्रीला लागतात ते गुण त्याच्यात उपजत होते. त्याला निघताना वीस रुपये दिले. घेताना त्याच्या चेह-यावर कुठेही तुपकट लाचारी नव्हती. उलट आपलं चीज केल्याचा अभिमानयुक्तं आनंद होता. ढाब्याच्या एंट्रीला आम्ही निघाल्यावर तो हात वगैरे हलवून कुठलाही औपचारिकपणा न करता एखाद्या मोठ्या माणसासारखं 'या परत' म्हणाला. शब्दात सांगता येणार नाही असं काहीतरी वाटून गेलं. 

त्या रोडला परत जाणं झालंच नाही. ते पोरगंही आता तिशी ओलांडून गेलं असेल. तो ढाबा असेल, नसेल, माहित नाही, असला तर आठवेल की नाही हे ही आहे. पण कसलंही नातं, दोस्ती, ओळख नसलेला तो छोटा जवान ज्या प्रेमानी, हस-या चेह-यानी म्हणाला ना 'या परत', तसं अनोळखी माणसाकडून ऐकल्यालाही तेवढीच वर्ष झाली. :)

जयंत विद्वांस     
      

गॉड नोज...



मी आस्तिक आहे की नास्तिक, हे मला स्वतःला न सुटलेलं कोडं आहे. तसंही बरीच माणसं जशी संधी न मिळाल्यामुळे, धाडस नसल्यामुळे सज्जन, अभ्रष्ट असतात तशीच ती सोयीनुसार आस्तिक/ नास्तिकही असतात, अर्थात मी ही त्यापैकीच एक. पूजाअर्चा, रांगा लावून दर्शन, अमुक देणगीत तमुक पटीत काम होतं, उपवास वगैरे प्रकार मात्रं मला आवडत नाहीत. दिसलं देऊळ की लगेच माझा हात छातीपाशी जात नाही. मी देवळात क्वचित जातो. 'तो' आहे अशी चर्चा पुरातन कालापासून आहे पण 'तो' देवळातच आहे वगैरे प्रकार समाधानासाठी आहेत. 'त्या'च्याकडून कुठलाही प्रतिवाद शक्यं नसल्यामुळे त्याच्या नावावर अनंत गोष्टी खपवल्या जातात. 'तो' निराकार आहे असं म्हणतात पण माणसांनी त्याला रूप, रंग, चेहरा, आकार आणि धर्मसुद्धा दिला. तरीपण सगळ्या शक्यता संपतात तेंव्हा आपण 'दिवार'च्या अमिताभसारखं नाईलाजाने का होईना या अदृष्यं शक्तीच्या पायाशी जातोच. कुठेतरी असं काही घडून जातं की विश्वास ठेवावा लागतो. माणसाच्या रूपात तो मदतीचा हात देऊन जातो आणि तो माणूस नंतर सापडतच नाही तेंव्हा कोडं अजून वाढतं. 

सत्रह साल पहले की बात है! पूर्वसुकृत म्हणा किंवा या जन्मातलं पुण्यं कमी पडलं असेल म्हणून क्षमाला माझ्याशी लग्नं करावं लागलं यावर ती ठाम आहे. मोरावळा जुना होत जातो तसा तो अजून चविष्ट होत जातो, त्यातले आवळे करकरीत रहात नाहीत, अगदी मऊ पडतात. पण आता सतरा वर्ष होतील तरी तिच्या मतात फरक न पडता ते अजून दृढ होत चाललंय. चांगल्या बायकांच्या नशिबात असलेच ('असलेच' म्हणजे काय याची तिची व्याख्या सांगायला साधारण दोन पानं लागतील) नवरे असतात हे पटवायला तिला स्मिता पाटील (राज बब्बर), शिवानी कोल्हापुरे (शक्ती कपूर) आणि क्षमा जोशी (जयंत विद्वांस) ही तीन उदाहरणं पुरेशी आहेत. तर लग्नं झाल्यापासून सहा सात महिन्यानंतरची गोष्टं असेल, जेंव्हा मी बोलायचो आणि ती ऐकायची, तेंव्हाची. आता ड्युरासेल टाकल्यासारखी फक्तं ती बोलते (रेडिओ बंद तरी करता येतो बटणानी) आणि मी ऐकतो (याला बोलणी खाणं असं म्हणतात). 

तर ती डोंबिवलीहून पुण्याला येत होती. बरोबर लगेज काहीही नव्हतं. फक्तं पर्स. लोकलनी कल्याणला आली, उतरली तर समोर 'सिंहगड' उभी. तेंव्हा स्लिमट्रिम असल्यामुळे ती चपळाई करून लगेच चढली. गाडी हलली. 'जिंदगी के सफरमें गुजर जाते है जो मकाम' गाण्यात कल्याण सोडल्यावर 'दिवार'मधे शशी आणि अमिताभच्या वाटा जशा देवळापासून वेगळया होतात तसे ते कर्जत आणि कसा-याला जाणारे फाटे दिसतात, तिथे हिची 'सिंहगड' अल्झायमर झाल्यासारखी कर्जतच्या फाट्याला फाट्यावर मारून कसा-याकडे वळाली. मगाचच्या धावपळीत आलेला घाम तोवर पुसून झाला होता तो परत जमा व्हायला लागला. एकानी सायलेंट घाम काढला, 'बहेनजी, ये 'पंचवटी' है, गलती आपकी नही है, ये थोडी लेट है तो 'सिंहगड'की जगह ये लगाई थी, अनाउन्समेंट सुनी नही क्या आपने! और दोनोका कलर भी सेम है!' आता नाशिक किंवा आधी कुठे थांबेल तिथे जावं लागणार या कल्पनेनी हिला घाम फुटला. भैय्ये लोक होते गाडीत. ते म्हणाले जनरली कसा-याला सिग्नल नसतो, हळू होते गाडी, तुम्ही उतरा. खरंच गाडी कसा-याला स्लो झाली. हिला दोघातिघांनी प्लॅटफॉर्मला उतरवलं. ती चेह-यानी (फक्तं) अतिशय गरीब आहे. माझ्याकडे तिकीट नाही हे तिच्या तोंडावर स्क्रोल होत होतं. तिला टीसीने धरलं आणि इस्टोरी सांगूनही व्हीटीपासूनचा दंड घेतला. 

ठाण्याचा एक मुलगा हे सगळं ऐकत, बघत होता. त्यानी तिला धीर दिला, तिचं कल्याणचं तिकीट काढलं. कल्याणला उतरून पुण्याचं तिकीट काढून दिलं, तिला 'सह्याद्री'त बसवलं. तेंव्हा मोबाईल नव्हता. स्वतः:चं नाव आणि पत्ता लिहून दिला. माझा घरचा नंबर घेऊन गाडी सुटल्यावर काय झालंय ते त्यानी सविस्तर सांगितलं. उतरणार कुठे हे विचारायचं राहून गेलं, शिवाजीनगर की स्टेशन. साधारण दहाला 'सह्याद्री' पुण्याला येते. मी स्टेशनला गेलो आधीच. 'सह्याद्री' आली, प्लॅटफॉर्म रिकामा झाला तरी क्षमा नाही, मग शिवाजीनगरला गेलो तर तिथेही कुणी नाही, घरी फोन केला तर तिथेही नाही, परत स्टेशनला गेलो, तिथून फोन. मग रिक्षेनी गेली असेल असं गृहीत धरून घरी आलो, तरी नाही. दहाएक मिनिटांनी रिक्षा थांबल्याचा आवाज आला. सशाचा घाबरा चेहरा करून ती घरात आली आणि तिला रडू फुटलं. सगळी स्टोरी सकाळी सांग म्हटलं. मग सकाळी आम्ही 'बुगडी माझी सांडली गं' च्या चालीवर 'क्षमा आमची हरवली गं, जाता कसा-याला'च्या चालीवर सगळी स्टोरी ऐकली.  

घरी फोन करायला ती स्टेशनला थांबली. पीसीओवरून फोन करताना शेजारी ठेवलेली पर्स कुणीतरी आम्हांला नको असल्यासारखी उचलून नेली. आता घरी यायला रिक्षेला पैसे नाहीत. रिक्षा करून घरी आल्यावर द्यायचे एवढाच मार्ग. पण एक अपंग बाई आणि तिचा नवरा सिंहगड रोडला चालले होते, त्यांनी थोडी वाकडी वाट करून तिला घरापाशी सोडलं आणि एक रुपया न घेता, आभार मानायची संधी न देता ते निघून पण गेले. त्या मुलाचं नाव, पत्ता आणि फोन नं.ची चिट्ठी पर्समध्ये होती, ती पण गेली. आता तो तिला रस्त्यात दिसला तरी ती ओळखू शकणार नाही पण कुणीतरी अज्ञात सज्जन माणसानी केलेल्या मदतीचे आभार मानायचे राहून गेलं याची रुखरुख कायमची राहील. त्यानी काढून दिलेल्या तिकिटाचे पैसे तिनी तळ्यातल्या गणपतीला ठेवले. त्याचा प्रतिनिधी आला होता त्यामुळे ब्रँचऑफिसला जमा केले. आता या सगळ्यात देव कुठे आला असा प्रश्नं पडेलच पण माझं उत्तर त्या हुशार धर्मगुरूसारखंच आहे.   

एका धर्मगुरूला वाद घालण्यासाठी एकानी प्रश्नं विचारला, 'इज देअर गॉड?' त्यानी उत्तर दिलं पण आणि नाही पण, तो म्हणाला, 'गॉड नोज'. :)

जयंत विद्वांस 

(सदर पोस्ट टाकल्यानंतर पुढे आठवडाभर नविन पोस्ट न दिसल्यास मला काही नविन सुचलं नाहीये असा अर्थ काढावा. डोळ्यावरची सूज उतरली का? हाताला प्लास्टर अजून किती दिवस सांगितलंय? कामावर स्वतः गाडी चालवून जाऊ शकता का? वगैरे प्रश्नं विचारून वुंडवर सॉल्ट रबू नये,)

Thursday 15 September 2016

गेला तो गेलाच...

गेल्या कित्त्येक वर्षात गणपती बघायला, विसर्जन मिरवणुकीला गेलो नाहीये. तेवढीच गर्दी कमी. पूर्वी दिवाळीपेक्षा ती धमाल जास्ती असायची. लहान असताना आमचा मामा विजय अभ्यंकर आम्हांला गणपती दाखवायचा. तसे कुणी दाखवणार नाही आता आणि बघणारही नाही. विक्षिप्तपणाचा इसेंस त्याच्यात ओतप्रोत होता. पुणे दर्शन असायचं. भिकारदासला त्याच्याकडे जायचं, मग तो आला की निघायचं. दिशा ठरायची मग त्याच्यामागे जायचं फक्तं, का, कुठे वगैरे विचारायचं नाही. तिकडे पार कॅम्पापर्यंत, इकडे शिवाजीनगर, पश्चिमेला डेक्कन असा एरीया कव्हर व्हायचा. माणूस तिरळा होईल त्याच्याबरोबर गणपती बघताना कारण एक डोळा गणपती आणि एक त्याच्यावर ठेवायला लागायचा. फार कुठे न रमण्याचा त्याचा स्वभाव होताच. लहान मुलांचे हात धरण्याची वगैरे पद्धत नव्हतीच आमच्यात. एक तर तो तरातरा चालायचा आणि कधी पुढच्या गणपतीकडे सटकेल ते सांगता यायचं नाही. त्याचा बघून झाला म्हणजे आमचा पण झाला असा त्याचा समज होता. तक्रार केली तर उद्यापासून गणपती बंद. त्यामुळे हरवलो तर चूक आमचीच. 'नाही दिसलो मी तर शोधत बसायचं नाही, भिकारदासला जाऊन झोपायचं' इतका सोपा सल्ला होता. 

देखावा कितीही भारी असो, मूर्ती देखणी असो, भन्नाट लायटिंग असो, तो निर्विकार चेह-यानी बघायचा. कुठल्या वाड्यात वगैरे असलेला गणपती पण तो दाखवायचा. गुहेत शिरून बघायचे झाकलेले देखावे तो बघून या म्हणायचा. कॅम्पापर्यंत एवढे गणपती नसायचेच फार, उगाच तंगडतोड व्हायची पण बोलणार कोण. पेशव्यांचा रयतेचा एखादा गणपती बघायचा राहिला हा बट्टा नको म्हणून आम्ही जायचो, अगदी चार दिशांना स्वार सोडावेत तसं. 'इकडे कशाला'? कोण बोलणार. त्याच्या आवडीची मंडळं ठरलेली होती आणि त्या प्रत्येक मंडळाची खासियत पण होती. मंडईचा लाकडी शारदा गणपती, बाबू गेनूला फुलांची सजावट आणि पुढे वाजणारा तो चौघडा, सनई, ते ऐकत बराच वेळ आम्ही उभे रहायचो, तुळशीबाग अवाढव्य मूर्ती आणि खेडकरांची शिल्पकला, हिराबागेला कारंजी नाहीतर देखावा, जिलब्या मारुती, जोगेश्वरी, गुरुजी तालीम साधी मंडळं, दगडूशेठ म्हणजे न पाहिलेलं कुठलं तरी अवाढव्य मंदिर असायचं, सगळ्यात खतरा गणपती म्हणजे नातूबाग. 'हॊठोपे ऐसी बात', 'मुंगडा', 'नाच रे मोरा', 'परदेसीया, ये सच है पिया', 'ये मेरा दिल' असल्या गाण्यांवर उघडझाप करणारे विविध पॅटर्नचे रंगीबेरंगी दिवे बघण्यात तास निघायचा. क्षणार्धात गोल, त्याची चांदणी, तारा, लंबगोल, उभ्या सळया, आडव्या लहरी, तिरके बाण, स्वस्तिक काय नी काय एकेक व्हायचं. बघताना संगम साडी सेंटरच्या पायरीवर नाहीतर नवा विष्णूच्या दारात तो विड्या फुकत बसायचा निवांत. 

आमचं पर्वती दर्शनचं मंडळ अदृष्यं देखाव्यासाठी 'सौ साल पहिले'च्या धर्तीवर प्रसिद्ध होतं/आहे/राहील. गणपती आणि मंडप फक्तं, आपण मनातल्या मनात देखावा बदलून बघायचा. क्वचित दारूच्या किंवा ताडीगुत्त्यातून वगैरे वर्गणी बरी आली तर लाजेकाजेखातर गणपतीला अगदी उघड्यावर पडलोय असं वाटू नये म्हणून काहीतरी उभं रहायचं. त्यामुळे गावात पळ काढणं जास्ती आकर्षक होतं. या सगळ्या प्रकारात भेळ किंवा भजी मिळायची फक्तं. एकेवर्षी नऊला निघून पण आम्ही मंडईच्या पुढे सरकतच नव्हतो, साडेअकरा झाले तरी. बरं सांगायची पद्धत नव्हतीच आमच्यात. कंटाळून विचारल्यावर तो म्हणाला बारा वाजले की मग जाऊयात कारण त्याचा शनिवारचा उपास होता. 'समाधान'च्या बाहेर पोहे, भजीचा स्टॉल होता. १२.०१ मिनिटांनी रविवार लागल्यावर आम्ही पोहे, भजी हाणली मग विश्रांती घेऊन ताज्या दमाचे घोडे कूच करतात तसे आम्ही निघालो. दुस-या दिवशी पाय जाम दुखायचे तरीपण आम्ही जायचो. नंतर आमचे आम्ही जाण्याची अक्कल आल्यावर ते न बोलता बंद झालं.
.
बदलापूरहून, ओळखीतून, कुठून कुठून माणसं गणपतीत यायची आणि आम्ही हौसेने फिरायचो. धमाल यायची. आता तो उत्साह राहिला नाही. खिशात पैसे आहेत, कंटाळा येईल तिथून रिक्षानी घरी येऊ शकण्याची, भूक लागल्यावर समोर दिसेल त्या हॉटेलात खाण्याची ऐपत आहे पण जाणं काही होत नाही. देखावे अजून सुंदर असतील, लायटिंगचे पॅटर्न जास्ती मनोहारी असतील, नुसता ठेका असलेली शब्दं हरवलेली गाणी असतील पण पुणं काय किंवा अजून कुठलं दुसरं शहर काय लहान मुलांनी चुकण्यासारखं राहिलेलं नाही. 

आता ती रुपयात बचकभर मिळणारी गरम गोल भजी आणि तर्कटासारखा पुढे निघून जाणारा विजूमामा पण नाही. तो २५ जानेवारी २००६ निघून गेला तो गेलाच. 

जयंत विद्वांस    

मन्या मराठे...

पावणेसहा फुटाच्या आसपासची उंची, गव्हाळ वर्ण, लबाड वाटणारे डोळे, सरळ नाक, शिडीशिडीत अंगकाठी आणि प्रथमदर्शी अबोल वाटेल असा हा गोष्टीवेल्हाळ माणूस माझा मित्रं आहे. चुकलो, त्यानी मला मित्रं मानलंय हा त्याचा मोठेपणा आहे, नाहीतर माझी त्याच्याशी बोलण्याची सुद्धा लायकी नाही असं त्याचं मत आहे. हा नावावरून वाटतो तेवढा साधा, सरळ माणूस नाही. फक्तं दिसायला सालस, भिडस्तं वाटू शकतो पण ओळख वाढली की वाट्टेल ते बोलेल, चारचौघात तुमची लाजही काढेल. मुळात तो अतिशय भावनाप्रधान माणूस आहे पण त्याचं प्रदर्शन करणं त्याला जमत नाही, त्याला गर्दीचा त्रास होतो, म्हणाल तर माणूसघाणा आहे आणि तुमचं मैत्रं जुळलं चुकून तर मात्रं तो अतिशय लाघवी माणूस आहे. अतिशय पराकोटीचा दुराग्रह एवढा दुर्गुण सोडला तर बाकीचे दुर्गुण सुसह्य आहेत किंवा त्यांची सवय झाल्यामुळे ते दुर्गुण आहेत हे आपण हळूहळू विसरतो. त्याचे गुण शोधावे लागतील इतके विरळ आहेत कारण स्वतःबद्दल जास्तीत जास्ती गैरसमज कसा होईल याची तो पुरेपूर काळजी घेतो.

फटकन, कुचकं बोलल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. अतिशय घाणेरडं, मनाला लागेल असं तो शब्दं न शोधता बोलू शकतो. आता पन्नाशीला आलेला हा माणूस मनानी मात्रं अजून लहान आहे. रस्त्यानी जाताना बॉलिंग करेल, गाडीवरून जाताना मोठयांदा ओरडेल, समोरचा दचकला की आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करेल, मागे रस्त्यात चालताचालता लंगडी पण घालायचा पण आता जरा आचरट चाळे त्यानी बंद केलेत. एकदा गंभीर चेहरा करून तो मला म्हणाला होता, 'तुझं वय काय रे?' 'तुझ्याएवढंच'. 'तुम्हांला भडव्योहो विचारलंय तेवढंच सांगता येत नाही, **त बोट घालायचं आणि मग वास येतो म्हणायचं'. 'बरं, सत्तेचाळीस, त्याचं काय आता'. 'तू काय म्यॅच्युअर्ड वाटतोस रे, काय करतोस एक्झॅक्ट्ली तसं वाटण्याकरता की मठ्ठ दिसत असल्यामुळे मॅच्युअर्ड वाटतोस?' असल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नसतात. तिस-या चौथ्या वाक्याला जर त्याला वास आला की आपण त्याचं बौद्धिक घेतोय तर मूळ विषय विसरून आपल्याला कशी अक्कल नाही याचा मोनोलॉग चालू होतो, मग आपण फक्तं श्रोते.

त्याला पडणारे प्रश्नं आपल्या बुद्धीच्या बाहेरचे असतात. तो कधी काय विचारेल ते तुम्ही सांगूच शकत नाही. 'कधी गांजा ओढला आहेस का?' माझे डोळे बाहेर आले. 'गांजाssss? छे, तू ओढला आहेस?' 'मी तुमच्यासारखी भिकारडी व्यसनं करत नाही, साला पण तो नवाबासारखा हुक्का आणून मागे लोडबिड लावून वर ती फरकॅप घालून ओढावा अशी माझी जाम इच्छा आहे'. त्याची बायको आणि मुलगी गरीब आहेत म्हणून हा तर्कट माणूस तरलाय. 'अरे पण बायको धूर काढेल की घरात असले उद्योग केलेस तर'. 'ती कशाला काय बोलेल, एकदा करून बघायचंय फक्तं, माझा काय त्रास आहे आणि त्यात, कोळसे माझे मी पेटवेन आणि मी काय मीनाकुमारीसारखं तिला 'इन्ही लोगोने' म्हणायला सांगतोय का? बरं ते मरू दे, पण साला एकदा ते लखनौला जाऊन आपण मुजरा बघून येऊ. आपल्याला काय हात धरायचा नाही, काही नाही, बघू तरी काय प्रकार आहे'. त्याच्या कुठल्याही बोलण्यापुढे गप्पं बसण्यासारखा सोनेरी उपाय नाही. कुठलीही वाईट गोष्टं जाणून घ्यायची त्याला हौस आहे, करणार काहीच नाही पण माहिती हवी.

तसा तो कामात वाघ आहे कारण नोकरीच्या ठिकाणी त्याची वट आहे. ऑफिसची कामं कधीही पेंडिंग न ठेवणारा हा माणूस घरात मात्रं अत्यंत बेशिस्त आहे. तेवढ्या एका कारणाकरता बायको त्याला सतत झोडते आणि हा चक्कं ऐकून घेतो. 'सुधार की लेका, पण मला कोडं आहे, तू ऐकून घेतोस याचं'. 'अरे, तिला पण आऊटलेट पाहिजे की, मला बोलल्याच्या आनंदात तिचे पुढचे किती तास सुखात जात असतील सांग'. मन्या माणसाला निरुत्तर करण्यात पटाईत आहे. बरेचजण त्याचं चटपटीत बोलणं ऐकण्यासाठी, शिव्या खाण्यासाठी त्याला मुद्दाम उकसवतात आणि मग पट्टा चालू झाला की अपमानसदृश कुचकं बोलणं समाधानानी ऐकतात. एकदा असेच आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. त्याच्या एका कलीगचं लग्नं व्हायचं होतं. डोक्यानी थोडा कमी आणि चाळीशीच्या आसपासचा होता. एकतर दिसायला अतिशय कुरूप पण बाता सगळ्या 'किती सामानांना कसं कसं फिरवलं'. मन्या सगळं निमूट ऐकत होता. अति झाल्यावर म्हणाला, 'जोश्या, तू जेवढी स्वप्नं बघितली आहेत ना तेवढ्या वेळा मी झोपलोय सामानांबरोबर'. जोश्या बिचारा गार पडला. 'कशाला बोलायचं उगाच, थापा मारतोय तर मारू दे की, तुला काय करायचंय'. 'बाता माराव्यात पण इतक्या पण नको रे, आजारी पडेल अशाने, जे व्हायला हवंय ते नशिबात नाही त्याच्या, वेडा होईल अशानी'.  

मन्या विकतची दुखणी घेण्यात हुशार आहे. सल्ला मागायचा असेल तर मन्याकडे मागावा. कुठल्याही विषयवार तो सल्ला देऊ शकतो पण तुम्हांला रुचावं म्हणून तुमच्या सोयीचा सल्ला तो देणार नाही. तो लॉजिकली बोलतो, आपल्याला न सुचलेली शक्यता त्याला पहिल्यांदा सुचते. त्याचा सल्ला पहिल्यांदा पचनी पडत नाही त्यामुळे तो ऐकला जात नाही पण त्याचा त्याला राग येत नाही. फक्तं त्याचं भविष्य खरं झालं की तो पटाशीनी तासल्यासारखी आपली सालं काढतो. 'फुकट *वायला मिळालं की किंमत नसते, पैसे टाकून मिळालेला सल्ला शिरसावंद्य असतो'. आपण गप्पं बसायचं. 'काय काय हागून ठेवलंय ते सांग म्हणजे निस्तरायला'. मन्या मग त्याला जेवढं शक्यं आहे तेवढं करतो पण त्याचे आभार वगैरे मानलेले त्याला आवडत नाहीत. त्यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख त्याच्या तोंडातून कधीच येणार नाही. अनंतवेळा पैसे बुडून सुद्धा तो लोकांना पैशाची मदत करतो. चिडला की शिव्या देतो, परत कुणाला उभं करायचं नाही वगैरे ठरवतो. ते अर्थात अल्पकाळ टिकतं.

मन्याचं एक मात्रं आहे. तो फसवत नाही कुणाला. एवढा तोंडाळ, उर्मट, फटकळ असूनही बायकांशी मात्रं त्याचं जास्ती पटतं. त्याला भडकवण्याकरता मी म्हटलं एकदा, 'मन्या, लफडी किती केलीस आत्तापर्यंत, खरं सांग'. 'दोन हाताची बोटं पुरतील, एवढी नक्की. पण कधीही कुणाला फसवलं नाही आणि माणूस आवडला, बोललो म्हणजे काय लफडं असतं का लगेच? कधी कधी नुसत्या गप्पा मारल्या तरी माणूस आवडतो'. 'पण मग कधी गुंतला नाहीस का?' 'गुंतलो की, समोरचा माणूस पण तसा हवा रे गुंतायला. माझं 'झोपणं' हे उद्दिष्टं कधीच नव्हतं त्यामुळे मी कुणाशीही डोळ्यात डोळे घालून मोकळेपणानी बोलू शकतो. बायकांना गोंडा घोळणारी माणसं आवडत नाहीत, तुम्ही लोक तिथेच मार खाता कारण तुमची ध्येयं ठरलेली असतात. कुठलीही गोष्टं सहज घडायला हवी, मॅनेज करता तुम्ही लोक'.

मन्या कसा का असेना एक माणूस म्हणून मला तो आवडतो. तर्कट आहे, विक्षिप्त आहे, माणूसघाणा आहे, उर्मट आहे पण मनानी लोण्यासारखा आहे, चटकन वितळणारा. सगळ्या गावाची दु:खं तो गंभीर चेह-यानी ऐकतो, त्यावर बोलतो, लिहितोही पण स्वतःबद्दल तो क्वचित बोलतो. एकदा बोलता बोलता तो म्हणाला होता, ''आपलं आपल्यापाशी, आणि आपण सांगताना नेहमी आपलं कसं बरोबर आहे हेच सांगतो. त्यामुळे जे काही असेल ते माझं माझ्याकडे, ते माझ्याबरोबर जाईल. त्यावर चर्चा कशाला? एकटा असलो की मी सगळं परत आठवतो सगळं. माझी आठवण कुणी काढत असेलच की आणि समजा नसेल काढत तर राहिलं, मग तक्रार कशाला? त्यामुळे मी माझ्या मते जे बरोबर वागलोय त्याची खंत मी करत नाही. मला कुणी फसवलं, खोटं बोललं की राग येतो पण मी त्या माणसाबद्दल कधी वाईट बोलत नाही'. सापडला सापडला वाटेपर्यंत हा माणूस कायम वाळूसारखा माझ्या हातातून निसटत आलाय.

पाय जमीनीवर ठेवायचे असतील तर मन्यासारखा दोस्तं हवा. तोंडावर शिव्या देऊन मागे कुणाकडे तरी कौतुक करणारा. परवाच त्याला म्हटलं. 'व्यक्तिचित्रं चांगली जमतात ना रे मला आता?' 'चांगली? माकडा, बरी असा शब्दं आहे त्यासाठी. चांगली हे लोकांनी म्हणायला पाहिजे. पुलंसारखी लोकांना तोंडपाठ आहेत ती? त्यातलं एखादं वाक्यं म्हटलं तर कशातलं आहे हे आठवतं लोकांना? एका वाक्यात तुझी लायकी सांगू? 'तू बरं लिहितोस, फक्तं इतरांपेक्षा चांगलं लिहितोस एवढंच'. कुणापेक्षातरी चांगलं यात रमू नकोस, आपल्यापुढे आहेत त्यांच्या लेव्हलचं जमतंय का हा ध्यास हवा'. खरंतर आपल्यात पण एक मन्या मराठे लपलेला असतोच, उर्मट, तिरसट, लोक काय म्हणतील याची काळजी न करणारा पण आपल्याला तसं वागता येत नाही म्हणून असली तिरपागडी माणसं आपल्याला आवडत असावीत. त्याला म्हटलं, 'तुझ्यावर लिहितो आता'.

मन्या म्हणाला, 'याचा अर्थ तुझ्याकडे विषय नाहीत. तुला काय माहितीये आणि माझ्याबद्दल? वरवरचं खोटं, नाटकी लिहिशील. आपल्या माणसाबद्दल लगेच लिहायचं नसते रे माकडा, उत्सुकता संपते'. मन्याकडे मी लक्ष देत नाही, तो 'आपल्या' माणसाबद्दल म्हणाला या आनंदात उरलेल्या आयुष्यात मी त्याच्या शिव्या हौसेने खात राहीन एवढं नक्की. :)

जयंत विद्वांस
 

'दी'ज्, 'दा'ज्, 'अक्का'ज् आणि 'भैय्या'ज्...

पुरातन काळापासून जर फेबू असतं तर 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती', 'बहनाने भाई की कलाईपे प्यार बांधा है', 'फुलोंका तारोका सबका कहना है', वगैरे गाण्यांना मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी मुकली असती. जिला भाऊ नाही ती चंद्राला ओवाळते म्हणे. एकूणच बहीण भावाचं नातं आपल्याकडे जरा वरच्या रँकलाच आहे. बहिणी बहिणी किंवा भाऊ भाऊ यापेक्षा बहीणभाऊ नातं म्हणजे एकदम डोळ्यातून पाण्याचे लोट, छातीत डाव्या बाजूला मायक्रॉन कळ वगैरे. बहिणीवरून दिलेली शिवी मारामारीला कारणीभूत ठरू शकते इतका तो जिव्हाळ्याचा विषय आहे. मला पण लहान असताना बहीण नसल्याने (अर्थात मी मोठा झाल्यावर पण नाहीये) इतर मुलांच्या हातांवर कासाराकडून हातभर चुडा भरून घेतल्यासारखी राख्या घातलेली मुलं पाहिली की वाईट वाटायचं. उतरत्या व्यासाचे स्पंज, वर एक प्लास्टिकचं कुठल्यातरी सिनेमाचं नाव आणि एक मणी असल्या राख्या इतिहासजमा झाल्या. आता ब्रेसलेट राखी असते. खरंतर गोंडा जेवढा शोभतो तेवढं दुसरं काहीही नाही. असो! तर या नात्यात मला चुलत, मामे, आत्ते वगैरे बायफरकेशन करणारे विचार मनाला कधी शिवले नाहीत, सगळ्या सारख्याच.

या सगळ्यात मानलेल्या हा प्रकार आला नंतर. त्यात वाईट काही नाही. ज्यांना बहीण नाही किंवा जिला भाऊ नाही त्यांनी काय करायचं. वडिलांना सांगून घरात मेंबर वाढवला तर ते रस्त्यावर येतील संख्या वाढल्यानी त्यापेक्षा हे जास्ती सोपं आहे. पण त्यापैकी कुणाला प्लॅनिंग किंवा अपघाताने असेल पण भाऊ/बहीण झाली की मग मानलेली नाती मान टाकताना पाहिलीयेत. वय वाढत गेलं की ती ओढ कमी होत असावी. काहीवेळेस इतर उद्योग करण्याकरता पण हे नातं उपयोगी पडतं. सगळ्यांना सगळं माहित असतं पण ते भाऊ बहीण असतात, अर्थात कुणी कुणाशी काय नातं ठेवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्नं आहे (आपल्यात नाही दम तर काड्या कशाला घालतो मग जळक्या - परममित्रं मन्या मराठे). तर हे सगळं सांगायचं कारण म्हणजे फेसबुकावर हे नातं जेवढं उदयाला आलं तेवढं कुठेच नाही. एकदा कुणाला 'दा' म्हटलं की पुढचे संभाव्यं इनबॉक्सात येऊन लाळपतनाचे धोके टळतात हा फायदाही त्यात असेल, माहित नाही. पण हे नातं चिकटवलं जातं, मिरवलं जातं.

आदराने, वयाच्या मोठेपणाने दा, जी, अक्का, भैय्या, दादू, दद्दू वगैरे उपाध्या समजू शकतो, त्यात गैर काहीही नाही. वयाचा मान ठेऊन अशी उपाधी दिली की जवळीक वाटते हे ही आहे पण उगाच नाती चिकटवायला कशाला लागतात ते मला कळलेलं नाहीये. मुळात आपल्याकडे एक बाप्या, एक बाई जरा मोकळेपणानी बोलताना दिसले की प्रद्युम्न, अभिजित, दया बायनॉक्युलर घेऊन लगेच घटनास्थळी हजर असतात. 'कुछ तो गडबड है, दया'. त्यामुळे एकदा दा, तायडे म्हटलं की बरं पडतं, सी.आय.डी.मंडळी दुस-या घटनास्थळी धाव घेतात. नात जोडलं किंवा त्याला नाव दिलं म्हणजे नेमकं काय होतं? अर्थात ते ही मान्य केलं पण त्याचं ते नाटकी मिरवणं बघितलं की हसू येतं. काय एकेक उमाळे असतात. एवढं प्रेम जगात अस्तित्वात असतं तर प्रॉपर्टीची भांडणं झालीच नसती. सख्ख्या बहिणीला गावातल्या गावात भेटायला वेळ होत नाही पण फेबुवर बंधूज आणि भगिनीज एकमेकांवाचून सुकतात. काय एकेक स्टेटस असतात, वाचून मला तर आपण माणूस नाहीये अशीच शंका वाटायला लागते. 

'तायडे, कुठायेस? मिस यू'. तायडी पण लगेच मिसकुटी होते. नाहीतर ताईराजेंच्या गंभीर पोस्टवर आकाश कोसळल्यासारखं 'काय गं, काय झालं, फोन करू का?' अरे बाबा, तिचा प्रॉब्लेम एवढा मोठा असेल तर कर की फोन, जाहिरात कशाला? पण लगेच दद्दूला हमी देणारं स्पष्टीकरण कॉमेंटला येतं आणि दादासाहेब सुटकेचा निश्वास सोडतात. आता मी एक खत्रूड आहे ते जाऊ दे त्यामुळे माझ्या भाग्यात असला योग येण्याची शक्यता नाही (असल्या कुजकट पोस्ट लिहिल्यावर तुला फक्तं कानफटायला जवळ घेतलं जाईल - परममित्रं, दुसरं कोण) पण मला असं कुणी जाहीर ममत्वं दाखवलं तर मला भरून येईल, 'दे दे प्यार दे' गाण्यात स्मिता पाटील प्रेमळ वागते तेंव्हा अमिताभ जसा चक्रावतो तसं आपण चुकीच्या गल्लीत शिरलोय असं मला वाटेल. अव्यक्तं प्रेम जास्ती भावनाशील असतं असं माझं मत आहे, मग नातं कुठलंही असो. माझी चुलत बहीण जन्माला आल्याचा सगळ्यात जास्ती आनंद मला झाला होता कारण आता ती मोठी झाल्यावर मला राखी बांधेल हा माझा आनंद अमोजणीय होता.

कुणी सेलिब्रिटी गेला की त्याचं दिवसभर अथक दर्शन असतं, त्यादिवशी विनाकारण तो माणूस मला अप्रिय होतो, त्याच्यावर कितीही प्रेम असलं तरी. काही नाती निनावी ठेवा रे, नावं चिकटवून माती करू नका. आणि नाती तयार करा, जपा पण त्यांना रस्त्यावर गळे काढून ओरडत मिरवू नका. कृत्रिम फूल जास्ती आकर्षक असतं पण त्याला वास नसतो. अडचणीच्या वेळी 'मी आहे रे पाठीशी' हे आयुष्यात कधीही न बोलता जो/जी येऊन मागे 'रॉक ऑफ जिब्राल्टर' सारखा भक्कम थांबतो/थांबते ते नातं महत्वाचं मग त्याला नाव असायलाच पाहिजे असं नाही. आपण बनेल, मतलबी आहोतच पण या सगळ्यामुळे कृत्रिम होत जाऊ की काय अशी भीती वाटते.

अत्रे काय सुंदर लिहून गेलेत 'श्यामची आई' मधल्या 'भरजरी गं पितांबर'मध्ये 'द्रौपदी बोलली हरीची मी कोण?, परी मला त्याने मानीली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचेमाझ्यावर ऋण' आणि
खालच्या ओळी कालातीत आहेत, काळ बदलला तरी हे नातं राहिलंच पण त्यात या ओळीतली भावना असेल तर मजा आहे. बाकी नौटंकी तर चालूच राहील. 

'रक्ताच्या नात्याने
उपजे न प्रेम,
पटली पाहीजे
अंतरीची खूण,
धन्य तोची भाउ
धन्य ती बहीण,
प्रीत ती खरी जी
जागे लाभाविण

जयंत विद्वांस

(सदर 'शोधनिबंध - भाग (४)' हा 'फेसबूकीय मानसशास्त्रीय आजार - लक्षणं, परिणाम, कारणे, उपाय आणि उच्चाटन' या प्रबंधाकरीता मिळालेल्या शिष्यवृत्तीतून लिहिला आहे. कुणावर वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नाही, कुणाला स्वतःला लागू होतंय असं वाटलं तर गेट वेल सून :P  )

भाग (१) - फेसबुकीय वाढदिवस
भाग (२) - मैं तो आरती उतारू रे
भाग (३) - ये दिल मांगे मोअर